मुंबई – अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट शिवसेना – भाजपच्यासरकारमध्ये सहभागी झाला. त्यानंतर या गटाला सत्तेची उब मिळाली. पण मंत्र्यांनी मात्र पक्ष संघटनेच्या बांधणीकडे साफ दुर्लक्ष केले. यासंबंधीची थेट नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत दिसून आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे मंत्री त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांत जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या मंत्र्यांवर संबंधित जिल्ह्याची जबाबदारी देऊन महिना लोटला. पण मंत्री आपापल्या जिल्ह्यांत जाण्यास उत्सुक नसल्यामुळे अडचण झाली आहे. यामुळे पक्षाने संबंधित मंत्र्यांकडून कामकाजाचा अहवाल मागवण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.
सद्यस्थितीत उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या त्यांच्या गटाचे 8 मंत्री सरकारमध्ये आहेत. या 8 मंत्र्यांना आपल्या खात्यांचा कारभार सांभाळतानाच पक्षवाढीसाठी काही जिल्ह्यांची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यानुसार, या मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांत जावून कार्यकर्ता मेळावे घेणे, पक्षाच्या शिबिरांना हजेरी लावणे, पदाधिकऱ्यांच्या बैठका घेणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. पण बहुतांश मंत्री अजून त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्याकडे फिरकलेही नाहीत. यावर देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.