Ajit Pawar : कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या शिबिरातून अनेक नेतेमंडळींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडले. यावेळी एकीकडे छगन भुजबळांनी मराठा आरक्षण व शरद पवार गटाकडून करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर दिले तर दुसरीकडे गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पक्षातील व्यवस्थेवर भाष्य केलं. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला.
अजित पवारांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यांनी यावेळी आगामी लोकसभा निवडणूका, समान नागरी कायदा आणि जातनिहाय जनगणनेविषयी भाष्य केले, दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेतला टोला लगावला.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना अजित पवार यांनी,” वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीचं लावतात असा काहींना याचा अनुभव आहे” असे म्हणत शरद पवारांना आणि सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. दरम्यान, हे बोलताना पुढे त्यांनी, दुसऱ्यांची मुलं पुढं जाताना द्वेष कशाला ? असा सवाल देखील उपस्थित केला.
दरम्यान, अजित पवार म्हणाले,’बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा आपण लढवणार आहोत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होणार आहे. पाच राज्यातील निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होणार आहे.’ अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.