जळगाव – अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट देण्यात आलेली नसून त्यांची हजारो प्रकरणात चौकशी होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. एक-दोन प्रकरणात नागपूर खंडपीठात एसीबीने कागदपत्र सादर केली असली तरी अजून बऱ्याच प्रकरणात चौकशी होवू शकते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांच्या काळात अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्री पद घेतले असले तरी त्यांनी क्लीन चिट दिली नसल्याने महाजन यांनी सांगितले.
तसेच रोहिणी खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव पक्षातल्या नेत्यांनीच केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. आणि त्या नेत्यांविरोधात पुरावे देण्यावरुन गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये कसा कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान एकनाथ खडसेंकडून भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पुरावे सादर केले असल्याच्या प्रश्नावर मात्र गिरीश महाजन यांनी उत्तर देण्याचे टाळत “नो कमेंट्स’ केले.
दरम्यान, माजी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना नागपूर पाठोपाठ अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलली आहे. तसेच ही प्रकरणे भाजप सरकारच्याच काळात पूर्ण करण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे घोटाळ्याचे 72 हजार कोटी कुणाच्या खिशात गेले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.