बीड -अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या दरवाढीवर केलेल्या टीकेला उत्तर देत बीडमधील शेतकऱ्यांनी टोमॅटोचे मोफत पार्सल त्याला पाठवले आहे.”सुपरस्टार असलो म्हणून काय झाले, आम्हाला देखील महागाईचा फटला बसतो. मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले’ असल्याचे वक्तव्य सुनील शेट्टीने केले होते.
या वक्तव्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे. तसेच टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून सुनील शेट्टी सारख्या कोट्यावधी लोकांच्या पोटात दुखत असल्याचे देखील आता म्हटले जात आहे. याच विधानाचा निषेध म्हणून परळीतील सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष मुंडे यांनी शेतकऱ्यांसह सुनील शेट्टीला मोफत टोमॅटोचे पार्सल पाठवले आहे.
सुनील शेट्टीच्या या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील टीका केली होती. “अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये. उगाच कांगावा करण्याची गरज नाही’, असे म्हणत तुपकर यांनी शेट्टीला उत्तर दिले होते.
टोमॅटोची टंचाई निर्माण झाल्याने दरवाढ झाल्याचे चित्र आहे. एकेकाळी कांद्यामुळे सरकार गेल्याचा अनुभव असलेल्या भाजपने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय घेतला. टोमॅटो उत्पादनात गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा मिळून 55 टक्क्याहून अधिक वाटा आहे. राज्यात अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, लातूर आणि नागपूर या भागामध्ये टोमॅटोचे उत्पादन अधिक होते. सध्या याच भागातल्या बाजारात टोमॅटोची आवक अत्यंत कमी झाली आहे. प्रत्येक कॅरेटला दीड ते दोन हजार रुपये भाव मिळल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्याच परिणाम टोमॅटोच्या भाव वाढण्यामागे होत आहे.