राज्य सहकारी बॅंक घोटाळा : मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांनुसार करवाई
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात अखेर आज ग्ुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांनुसार करण्यात आली. यामुळे अजित पवारांसह अन्य नेत्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूत गिरणी आणि साखर कारखान्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले; परंतु या कर्जाची परतफेड न झाल्याने बॅंकेचे प्रचंड नुकसान होऊन बॅंक अवसायानात गेली. यात सुमारे 25 हजार कोटींचा घोटाळा झाला. याला तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार आहे, असा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका सुरींदर अरोरा यांच्या वतीने ऍड. सतीश तळेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
हे संपूर्ण प्रकरण सध्या न्यायालयात असून याप्रकरणी न्यायालयाने अजित पवारांसह एकूण पन्नास जणांविरोधात येत्या पाच दिवसांत गुन्हा दाखल करा, असे निर्देश 22 ऑगस्ट रोजी दिले होते. न्यायालयाच्या या निर्देशांनुसार अखेर आज (26 ऑगस्ट) या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचा वापर केला गेला. यामध्ये 25 हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर 2001 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने राज्य सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते.