मुंबई – भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ९३३ वर पोहचला आहे.. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे सगळेच कलाकार आपापल्या घरात आहेत. कलाकार सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यातच कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान याला अटक करा या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे.
त्याने फेसबुकवरुन एक लाइव्ह व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्य करुन ‘कायम मुस्लीम नागरिकांनाच का दोषी धरलं जातं?, असा प्रश्न विचारला होता. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. तर काहींनी मुंबई पोलिसांकडे त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.
‘एक लहानशी मुंगी मेली तरी मुस्लीम नागरिक जबाबदार, हत्ती मेला तरी मुस्लीम नागरिक जबाबदार, दिल्लीत भूकंप आला तरी तेच जबाबदार. हे मुस्लीम नागरिक जमिनीच्या खालती जाऊन त्यांनी जमिनी हलवली म्हणून दिल्लीत भूकंप आला. म्हणजे थोडक्यात काय तर काहीही झालं तरी मुस्लीमचं जबाबदार. पण हे कटकारस्थान कोण रचतंय माहिती आहे का? कधी याचा विचार केला आहे का तुम्ही ? करोनावरुन प्रत्येकाचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला मुद्दाम धार्मिकतेचा रंग दिला जात आहे. त्यामुळे देशात जे असं करतायेत त्यांना सगळ्यांना करोना होवो ही इच्छा’. वादावरून पोलिसांकडे त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.