प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 24 – “देशरक्षणार्थ अनेक सैनिक सीमेवर आणि देशांतर्गत भागामध्ये वीरगतीला जातात. त्यांची स्मृती रहावे, असे कार्य करणे हे आपण सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे. सैनिकांकडून आपण प्रोत्साहन घ्यायला हवे आणि वीरगती प्राप्त झालेल्यांच्या कथा आजच्या तरुणाईला सांगायला हव्यात. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना आपण विसरलो,’ तर देशाची सर्वांत मोठी हानी होते,’ असे मत एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 वीरपत्नींच्या विशेष सन्मान बुधवार पेठेतील कोतवाल चावडी येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी कर्नल संभाजी पाटील, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ पायमोडे, सौरभ रायकर, यतिश रासने, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अभिजीत कोद्रे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. “आजमितीस लेहमध्ये सीमावर्ती भागात 20 हजारांपेक्षा जास्त लोक आहेत. तर, चीन गलवान खोऱ्यातदेखील अनेक सैनिक लढत आहेत. कोणत्या प्रकारच्या तापमानात हे सैनिक काम करतात, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांची, त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबीयांची आठवण ठेवण्याचे काम आपण करायला हवे,’ असे गोखले म्हणाले.
“ज्या वीर सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली, त्यांची आठवण आणि जे आजही सीमेवर कार्यरत आहेत, अशांची आठवण ठेवत त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आपण उभे राहायला हवे. त्यामुळे बांगलादेश युद्ध, कारगील युद्धासह विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला,’ असे चव्हाण यांनी सांगितले. कार्यक्रमापूर्वी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गणरायाचे दर्शन घेत वीरपत्नींनी आरती देखील केली. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.