नगर -श्रीरामपूरमध्ये हिंदू मुलींच्या धर्मांतराच्या विषयावर पुणे येथील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी बुधवारी आक्रमकपणे आवाज उठवित संबंधित अधिकाऱ्यांवर व दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांचे त्यांचे धर्मांतर केल्याच्या श्रीरामपूर शहर व तालुक्यात अठरा घटना घडल्याचा आरोपही आ. कांबळे यांनी केला.
श्रीरामपूर येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस इम्रान कुरेशी या आरोपीने शाळेतून पळवून आणून अत्याचार केले. बळजबरीने तिचे धर्मांतर केल्याबाबत आ. नीतेश राणे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. श्रीरामपूरच्या घटनेतील दोषी पोलीस निरीक्षक संजय सानप यांना विनाविलंब बडतर्फ करण्याची मागणी आ. राणे यांनी केली. यावेळी वेगवेगळ्या जातींमधील मुली पळवून त्यांचे धर्मांतर घडविण्यासाठी कशा पद्धतीने आरोपींना पैसे दिले जातात, याचे दरपत्रकच आ. राणे यांनी सभागृहात वाचून दाखविले. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मांतराबाबतचे कायदे अधिक टोकदार करण्यात येतील, असे सांगितले.
आ. कांबळे म्हणाले की, श्रीरामपूरला मी स्वतः त्या कुटुंबाची भेट घेऊन त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटून आलेलो आहे. गेल्या सहा महिन्यात श्रीरामपूर परिसरात 18 मुलींचे धर्मांतर झालेले आहे. अशा मुलींचे धर्मांतर करून त्यांचे लग्न ज्याठिकाणी लावून देण्यात आले, तेथील धर्मगुरूंसह धार्मिक स्थळांचे पदाधिकाऱ्यांवरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली.