अमोल मतकर
संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून ऋतुचक्रात झालेल्या कमालीच्या व अनाकलनीय बदलाचा मोठा फटका सर्वच घटकांना बसत आहे. त्यात नुकतीच गुलाबी थंडी हात-पाय पसरू लागली असतानाच त्याची धमाकेदार एंट्री झाली. साऊथ फिल्मच्या नायकासारखे त्याचे दणक्यात आगमन झाले आणि ती मात्र रुसली. कोपऱ्यात नाही, पण कुठेतरी दूर जाऊन बसली. त्याचं येणं आणि तिचं जाणं या दोन्ही गोष्टी जनतेच्या इतक्या अंगवळी पडल्यात की एखादे वेळी ती थांबली की चुकल्यासारखं वाटतं.
होय… आम्ही पाऊस आणि विजेच्या अनोख्या जोडीबद्दलच बोलतोय. महावितरणच्या या विद्युल्लता कन्येचा भरोसा कोणालाही आजवर घेता आला नाही. त्यामुळे भविष्यातही त्यांचं कधी एकत्रीकरण होईल याची शाश्वती कोणीही देऊच शकणार नाही. पाऊस आणि विजेचा लपंडाव महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजला आहे.
एरवी वर्षभरातील उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूंत इमानदारीने विभागलेल्या ऋतुचक्राचाही समतोल गेल्या काही वर्षांत ढासळलाय. हिवाळ्यात येणाऱ्या पावसाला हिवसाळा म्हणायला लागलेत लोक. त्यामुळे स्वेटर, कानटोप्या, जर्किन असे उबदार कपडे ठेवणीतून बाहेर काढण्याच्या काळात पुन्हा ठेवून दिलेले रेनकोट शोधण्याची वेळ जनतेवर आली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, त्याला साथ देणारा गार वारा असे ग्रामीण भागात कळ्हांगण अशी संज्ञा असलेले वातावरण सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाच्या अंगावर काटा आणत असतानाच, सायंकाळच्या सुमारास त्याचे दणक्यात आगमन झाले. सोबत विजांचा कडकडाट आणि गार वाऱ्याचे सपके… हातातले कामधंदे सोडून जो तो सुरक्षित आश्रयाला जात आहे. टाईमपास करायला आणि हा दादाबाबा कुठंवर पसरलाय याची माहिती घ्यायला टीव्ही लावला तोच… तीही गेली.
वास्तविक वादळाने विजेचे खांब वाकतील, विजेच्या तारा तुटतील अशी कोणतीही अवस्था नव्हती. गार वाराही शांततेत वाहत होता. पाऊस मात्र जोरदार सुरू होता. अशा परिस्थितीत वीज गेल्याने घरोघर काळोख झाला. सायंकाळची स्वयंपाकाची वेळ असल्याने, वाटण घाटण करण्यात आलेल्या व्यत्ययामुळे महिलावर्गही हिरमुसला. त्रस्त झाला. याचं खापर महावितरण कंपनीवर फोडायला जो तो सरसावला. आपल्यापरीने दूषणे देऊ लागला. गेल्या अनेक वर्षांपासून वीज आणि पावसाचं हे नातं जनता पाहतेय.
संगमनेरात दर शनिवारी दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवणाऱ्या महावितरणला आजवर एकदाही पावसाळ्यात वीज टिकवता आली नाही. अगदी पावसाची नाजूक भुरभुर आली, तरीही कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होईल याची पूर्ण खात्री जनतेला असते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर साऱ्या जगाच्या अगोदर चांद्रयान नेण्यात भारताला यश आलं असलं, तरी अशा तांत्रिकदृष्ट्या प्रगत देशातील वीजपुरवठा सुरळीत करता आला नाही हे आश्चर्य आहे. ग्राहकाचे वीजबिल थकल्यावर तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यासाठी धावणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या व्यवस्थापनाला पावसाळ्यात टिकणारी वीज का पुरवता येत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.