मानवी आयुष्य अतिशय अनमोल असते आणि ते एकदाच मिळते, अशा आशयाच्या इंग्लिशमध्ये ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’ किंवा हिंदीमध्ये ‘जिंदगी ना मिले दोबारा’ अशा प्रकारच्या म्हणी प्रचलित आहेत. उत्तर काशीमधील बोगद्यामध्ये 17 दिवस अडकलेल्या कर्मचार्यांसाठी मात्र या म्हणी सुदैवाने चुकीच्या ठरल्या असून त्यांच्यासाठी ‘जिंदगी मिली दोबारा’ हाच अर्थ प्रत्यक्षात आला आहे. तब्बल 17 दिवस जमिनीखाली बोगद्यासारख्या संकुचित आणि छाती दडपून टाकणार्या परिस्थितीमध्ये घालवणे सोपे काम नाही. 12 नोव्हेंबर रोजी उत्तर काशीमधील या बोगद्याचा काही भाग अचानक कोसळल्याने 41 मजूर या बोगद्यामध्ये अडकून राहिले होते. गेल्या 17 दिवसांच्या कालावधीमध्ये अथक परिश्रम करून या सर्व 41 मजुरांना सुरक्षितपणे सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने या सुटका मोहिमेमध्ये भाग घेतलेले सर्वच घटक अभिनंदनास पात्र आहेत. शिवाय ज्या प्रकारे या 41 मजुरांनी आपले धैर्य राखून ठेवले आणि सकारात्मक पद्धतीने या सर्व परिस्थितीकडे पाहिले तेसुद्धा अभिनंदनीय आहे. या 41 मजुरांची सुटका झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर जेव्हा त्यांचे प्रफुल्लीत चेहरे दाखवण्यात आले तेव्हा त्यांच्या चेहर्यावर कोणताही तणाव नव्हता.
जरी या चेहर्यावर सुटकेचा आनंद होता तरी त्यांनी ही सर्व आव्हानात्मक परिस्थिती अतिशय धैर्याने हाताळली होती हेच त्यातून सिद्ध होत होते. या सर्व मजुरांचा एक प्रकारे पुनर्जन्म झाल्याचे मानण्यात येत आहे. कारण ज्या ठिकाणी बोगद्याचे हे काम सुरू होते त्या ठिकाणी पुन्हा एखादी दरड कोसळण्याचा किंवा बोगद्याचा भाग कोसळण्याची शक्यता होतीच. या घटनेच्या पहिल्या दिवसापासून एनडीआरएफ असो एसडीआरएफ असो किंवा भारतीय लष्कर असो किंवा स्थानिक पोलीस असो त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने यंत्रणा राबवून या कर्मचार्यांच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त केला. देशातील राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते या घटनेचेही जरी भांडवल करायचा प्रयत्न करत असले तरी या घटनेनंतर अनेक प्रश्नही निर्माण होणार आहेत. त्यांची उत्तरे या राजकीय नेत्यांनाच द्यावी लागणार आहेत. मुळात 12 नोव्हेंबर रोजी जेव्हा ही घटना घडली तेव्हा अशा प्रकारे बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तब्बल 17 दिवस का लागले याचाही विचार करावा लागणार आहे.
अशा प्रकारची एखादी घटना घडल्यानंतर तत्काळ पद्धतीने उपाययोजना करून मजुरांची सुटका करण्याची यंत्रणा किंवा तांत्रिक कौशल्य आपल्याकडे नाही का, याचाही विचार या निमित्ताने होऊ शकतो. भारतासारख्या मोठ्या देशात गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीत अशा अनेक घटना घडल्या आहेत. एखाद्या खोल खाणीमध्ये मजुरांनी अडकणे आणि त्यातच त्यांचा मृत्यू होणे अशाही घटना अनेक वेळा घडल्या आहेत. काम चालू असताना बोगद्याचा काही भाग कोसळून कर्मचार्यांचा मृत्यू होण्याचेही प्रकार घडले आहेत. एखाद्या खाणीत खाणकाम सुरू असते किंवा एखाद्या बोगद्याचे काम सुरू असते तेव्हा अशा प्रकारच्या घटना अपेक्षितच असतात. जर अशा दुर्घटना घडल्या तर त्याला सामोरे कसे जायचे याचे नियोजनही तयार करावे लागते; पण जरी या घटनेमध्ये 17 दिवसांनी सर्व 41 मजूर सुखरूप बाहेर आले असले, तरी 17 दिवसांचा हा कालावधी निश्चितच जास्त होता.
17 दिवसांच्या कालावधीमध्ये मजुरांशी दैनंदिन संपर्क साधण्यात येत होता आणि त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येत होत्या म्हणून त्यांनी धैर्याने या संकटाशी मुकाबला केला. पण जर दुर्दैवाने या मजुरांशी कोणताच संपर्क झाला नसता तर काय झाले असते, याची कल्पनाही करता येणार नाही. उत्तराखंडमधील हा सर्व परिसर भूकंपग्रस्त आहे. या परिसरात अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडतात तरीही केवळ अट्टहासाने विकासाच्या नावाखाली जर डोंगर पोखरून बोगदे काढण्यासारखी कामे केली जात असतील, तर त्याचा आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. रस्ते आणि सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था ही विकासासाठी महत्त्वाची असली तरी अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना जर निसर्गाला धक्का पोहोचत असेल तर ते दीर्घकाळात किती परवडणारे आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. अर्थात, गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीमध्ये काश्मीरमधील डोंगराळ प्रदेशात असो किंवा कोकणपट्टीतील दुर्गम भागात असो रेल्वे मार्ग उभारण्याचे कामही झाले आहे.
एखाद्या दुर्गम किंवा डोंगराळ प्रदेशात असा एखादा प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू होतो तेव्हा सर्वच बाजूने त्या प्रकल्पाचा अभ्यास केला जातो. तो प्रकल्प खरोखरच शक्य आणि व्यवहार्य आहे का हे पाहून निर्णय घेतला जातो. पण भारतासारख्या मोठ्या देशामध्ये अनेक वेळा केवळ निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दबावाखाली एखादा प्रकल्प नैसर्गिकदृष्ट्या व्यवहार्य नसतानाही राबवण्याचा अट्टाहास केला जातो. त्यातूनच अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना घडू शकतात. उत्तरकाशीमधील या घटनेमध्ये कोणतीही मनुष्यहानी झाली नसली आणि सर्व 41 मजुरांची सुखरूप सुटका झाली असली तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून काय करता येईल, याचा विचार आताच करावा लागणार आहे. कारण विकासाच्या अतिअट्टहासापायी अशा प्रकारचे बोगदे बांधण्याचे किंवा महाकाय पूल बांधण्याचे काम नजीकच्या कालावधीमध्ये सुरूच राहणार आहे.
पण अशा प्रकारे विकासाची रचना करत असताना मानवी जीवन संकटात येणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठीच निसर्गाला अनुकूल अशा प्रकारेच प्रकल्पांचे नियोजन करून तशाच प्रकारे ते अंमलात आणण्यालाही प्राधान्य द्यावे लागणार आहे. उत्तरकाशी घटनेतील सर्व मजुरांची सुखरूप सुटका झाल्याने या घटनेचे गांभीर्य थोडे कमी झाले असले तरी नजीकच्या कालावधीमध्ये या घटनेवर उलटसुलट चर्चा अपेक्षितच आहे. या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचे प्रयत्न जरी सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून केले जाणार असले तरी या घटनेची जबाबदारी कोणालाही टाळता येणार नाही. या मजुरांची सुखरूप सुटका केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत असतानाच मुळात अशा प्रकारच्या घटना का घडतात, याचीही कारणमीमांसा या निमित्ताने होण्याची गरज आहे. कारण दरवेळी ‘जिंदगी मिली दोबारा’ हे सिद्ध होईलच, असे नाही.