– के. श्रीनिवासन
आज तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अधिकाधिक लोक ज्या पक्षाचे बटन दाबतील त्याचे पारडे जड ठरणार.
तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी आज मतदान होत आहे. 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशपासून वेगळे करून तेलंगणाची स्थापना झाली. पहिल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 63 जागा जिंकल्या होत्या आणि के. चंद्रशेखर राव हे पहिले मुख्यमंत्री झाले. आता तेलंगणा तिसर्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे. यावेळी भारत राष्ट्र समिती (पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती) आणि काँग्रेस यांच्यात लढत आहे. तसेच भाजप, एआयएमआयएम, जनसेना हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि राज्यात पहिले सरकार स्थापन केले. त्यावेळी काँग्रेस दुसर्या क्रमांकावर होती.
टीआरएसने त्यावेळी 63 जागा जिंकल्या होत्या; तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. तर तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) 15 जागा जिंकल्या होत्या. तेलंगणामध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमला 7 जागांवर यश मिळाले होते; तर भाजपने 5 जागा जिंकल्या होत्या. याशिवाय वायआरएस काँग्रेसने 3 तर बहुजन समाज पक्षाने 2 जागा जिंकल्या होत्या. 2018 मध्ये झालेल्या दुसर्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत सलग दुसरा विजय नोंदवला. या निवडणुकीत टीआरएसला 88 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 21 जागांसह दुसर्या क्रमांकावर राहिला. या निवडणुकीत भाजपाच्या जागा पाचवरून एकवर घसरल्या.
यंदाच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राव यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून ‘भारत राष्ट्र समिती’ अर्थात ‘बीआरएस’ असे केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असली तरी यावेळी काही जागांवर भाजप आणि बसपा रावांसह काँग्रेसलाही धक्का देऊ शकतात. दुसरीकडे, हैदराबादचा भाग हा ओवेसींच्या पक्षाचा बालेकिल्ला आहे. आजघडीला प्रत्येकजण आपापल्या विजयाचा दावा करत असले तरी तेलंगणातील मतदारांच्या मनात नेमके काय आहे, याकडे सबंध देशाचे लक्ष आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांच्यासाठी ही निवडणूक हॅट्ट्रिकची संधी आहे. त्यामुळे त्यांनी सर्वशक्तीनिशी या रणसंग्रामात उडी घेतली आहे. एखाद्या जादुगाराच्या पोतडीतून चमत्कारीकरित्या जशा नानाविध वस्तू बाहेर पडाव्यात तशा प्रकारे बीआरएस आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांकडून तेलंगणातील जनतेला आश्वासने दिली गेली आहेत.
या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसपा) देखील काही जागांवर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि बीआरएस काहीसे चिंतेत आहेत. केसीआरचा बालेकिल्ला असलेला आदिलाबाद हा एक मोठा जिल्हा होता, पण आता त्याचे चार भाग झाले आहेत (आदिलाबाद, मंचिरयाल, निर्मल आणि आसिफाबाद). या चार जिल्ह्यांतील दहा जागांवर सध्या फक्त बीआरएसचे आमदार आहेत. यंदा तेथे काँग्रेस आणि बीआरएसमध्ये थेट लढत आहे. भाजपही काही जागांवर शर्यतीत आहे. मात्र, या मतदारसंघांमध्ये बसपाची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आयपीएस अधिकारी प्रवीण कुमार कागजनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे हरीश बाबू, बीआरएसचे आमदार कोनेरू कोनप्पा आणि काँग्रेसचे आर श्रीनिवास आहेत.
येथे बसपा सर्वांना चकित करू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे आदिलाबाद जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातही रंजक लढत पाहायला मिळत आहे. येथे भाजपने आदिलाबादचे खासदार सोयाम बापूराव यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे गजेंद्र निवडणूक लढवत आहेत, तर बीआरएसने अनिल जाधव यांना तिकीट दिले आहे. या तिघांमध्ये बसपचे जंग बापू मेश्राम यांनीही उडी घेतली आहे. या मतदारसंघात बसपाचा पाठीराखा मतदार मोठा आहे. 2008 मध्ये निर्मलच्या भैंसा परिसरात जातीय दंगल उसळली होती. यामध्ये पोलिसांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. वाटोली गावात सहा जणांना जिवंत जाळण्यात आले होते, हा मुद्दा येथील निवडणुकीवरही परिणाम करू शकतो. निर्मल जिल्ह्यातील मुधुल मतदारसंघातून भाजपचे दोन चुलतभाऊ रामाराव पटेल आणि काँग्रेसचे नारायणराव पटेल हे दोन वेळा बीआरएसचे आमदार विठ्ठल रेड्डी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
आदिलाबाद मतदारसंघात सुमारे 18 टक्के मुस्लीम मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात बीआरएसला मतदान केले होते. यावेळी मुस्लीम मतदार काँग्रेस आणि बीआरएस या दोन्ही पक्षांसोबत जातील, असे वाटते. खानापूर मतदारसंघात गोंड आणि लंबाडा जमातीच्या मतांची संख्या लक्षणीय आहे. ही जागा फक्त त्यांच्यासाठी राखीव आहे. खानापूरमधून बीआरएसने आमदार अजमेरा नायक यांचे तिकीट रद्द करून जॉन्सन नायक यांना संधी दिली आहे. भाजपने माजी खासदार, माजी आमदार रमेश राठोड यांना संधी दिली आहे. काँग्रेसकडून गुज्जू पटेल रिंगणात आहेत.
ते तरुण आणि सामान्य कुटुंबातील असल्याने मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. विधानसभेच्या जवळपास एक तृतीयांश जागांवर अल्पसंख्याक मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतील, असे भारतातील तेलंगणा हे एकमेव राज्य आहे. येथील अल्पसंख्याक मतदार एकूण 119 जागांपैकी 40 जागांच्या निकालावर प्रभाव टाकू शकतात, असे तेथील निरीक्षकांचे म्हणणे आहे. अल्पसंख्याक मतांच्या ताकदीची जाणीव असलेल्या काँग्रेसने या वर्गाला आकर्षित करण्यासाठी विशेष घोषणा केल्या आहेत. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला 90 टक्के अल्पसंख्याक मते मिळाल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून बीआरएस व्होटबँकेला खीळ घालण्याचा प्रयत्न केला.
गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक मतांचा मोठा वाटा के. चंद्रशेखर राव यांना गेला. कारण एमआयएमचे ओवेसी यांची रावांशी सलगी राहिली आहे. तेलंगणातील हैदराबाद, रंगारेड्डी, महबूबनगर, नलगोंडा, मेडक, निजामाबाद आणि करीमनगर जिल्ह्यांत अल्पसंख्याकांचे प्रमाण मोठे आहे. हैदराबाद शहरातील लोकसंख्येच्या जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्या अल्पसंख्याक असून 24 विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव खूप जास्त आहे. संपूर्ण तेलंगणाचा विचार करता अल्पसंख्याकांची लोकसंख्या सुमारे 13 टक्के असल्याचा अंदाज आहे. यावेळी अल्पसंख्याक मतदार मोठ्या संख्येने काँग्रेसला मतदान करू शकतात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. कारण ते 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा देखील विचार करत आहेत. त्यानुसार, काँग्रेसच राष्ट्रीय पातळीवर भाजपशी स्पर्धा करू शकते अशी त्यांची धारणा आहे.
तेलंगणामध्ये केसीआर राव यांच्याविषयीची नाराजी मोठ्या प्रमाणावर आता दिसू लागली आहे. राव यांच्या सरकारमधील भ्रष्टाचाराची काही प्रकरणे समोर आली आहेत. तसेच बीआरएसमधील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दावा केल्याने निकालांनंतर सत्तेचा सुकाणू नेमका कोणाच्या हाती जाणार याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. अलीकडील काळात भाजप पक्षातून अनेक दिग्गज नेते बाहेर पडून काँग्रेसमध्ये सहभागी होत आहे. अलीकडेच दिग्गज अभिनेत्री एम. विजयाशांती यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्ष 15 वर्षांनंतर तेलगू राज्यात सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
काँग्रेसला या राज्यात दोन पक्षांची साथ लाभली आहे. तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी डीएमके या पक्षाने तेलंगणा राज्याच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. तामिळनाडू पक्षाचे सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तशी घोषणा केली आहे. याखेरीज वायएसआर तेलंगणा काँग्रेस या पक्षानेही याआधी डीएमके पक्षाप्रमाणेच भूमिका घेतली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे या पक्षाने जाहीर केले आहे. या निवडणुकीत बीआरएसचा विजय झाल्यास रावांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा वाढणार आहे. उलट त्यांना पराभूत करून काँग्रेस सत्तेत आल्यास दक्षिणेकडील आणखी एक महत्त्वाचे राज्य मिळाल्यास काँग्रेसला मोठी संजीवनी मिळणार. या दोघांना धक्का देत भाजपा सत्तेत येण्याची शक्यता मात्र धूसर दिसते.