सोनई – भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथील पाणी योजनेचे जलशुद्धीकरण प्रकल्प गेल्या सात ते आठ वर्षांपासून धूळ खात पडल्याने या प्रकल्पाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रकल्प बंद पडल्याने नागरिकांसह भाविक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. हा प्रकल्प त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांसह भाविकांनी केली आहे.
शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीतर्फे सन 2015मध्ये येथे पाणी योजनेद्वारे मंदिराच्या आवारात जलकुंभालगत जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पातून ग्रामस्थासह भाविक दहा रुपये भरून शुद्ध आरोचे पाणी घेऊन जात होते. या प्रकल्पाच्या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला होता.
ग्रामपंचायतीमार्फत घरोघरी नळ योजना करण्यात आली आहे. मात्र, येथे मळमिश्रित खराब पाणी असल्यामुळे येथील नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याचा विचार करून नळयोजनेबरोबरच ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण प्रकल्प टाकून ग्रामस्थासह भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले होते. या योजनेला 2015मध्ये साधारणपणे पाच ते सात लाख रुपये खर्च आला होता. परंतु या योजनेकडे संबंधितांनी लक्ष न दिल्याने सहा महिन्यांतच बंद पडली.
त्यामुळे ग्रामस्थांसह भाविकांनाही शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या हा प्रकल्प धूळ खात पडून असून, ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. तसे पाहिल्यास शनिशिंगणापूर ग्रामपंचायत अत्यंत सक्षम स्थितीत आहे. सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून पथकर नाक्याला परवानगी दिलेली असल्याने येणाऱ्या भाविकांकडून लाखोंचे उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळते. एवढे असूनसुद्धा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी सयाजी शेटे यांनी केली आहे.