राहाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षांत देशाच्या विकासाला मोठा वेग मिळाला. विविध क्षेत्रातील प्रगतीने मोठी गरुडझेप घेतली आहे. देशाच्या समृद्धीबरोबरच सामान्य माणसाच्या सुरक्षेचे कवच केंद्र सरकारने योजनांच्या माध्यमातून मजबूत केल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी मतदारसंघातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कषी अधिकारी सुधाकर बोराळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, तालुकाध्यक्ष दीपक रोहोम, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, सरपंच मेघना दंडवते आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थींशी साधलेला संवाद सर्वांनी पाहिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती असलेल्या दिनदर्शिकेचे विमोचनही करण्यात आले. या वेळी विविध योजनारूपी रथाला मंत्री विखे पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून ही यात्रा मार्गस्थ केली.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, विकसित भारत यात्रा सुरू करण्याचा देशातील पहिला प्रयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झाला आहे. या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचत आहेत की नाही आणि या योजनांपासून कोणी वंचित आहे का? याची उकल होईल. योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे या उद्देशाने सरकारी यंत्रणेप्रमाणेच पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही या योजनेच्या माध्यमातून लाभार्थींपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. विकासाचा दरही आज वेगाने पुढे जात असून, रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सेवा क्षेत्रापासून पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या संधी निर्माण झाल्यामुळेच आज इतर देश गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. भारतीय नागरिकांच्या पासपोर्टचा दर्जासुद्धा आता इतर देशांमध्ये उंचावला असून, केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारच्या माध्यमातूनही योजनारूपी कवच सामान्य माणसाला देण्याचे काम वेगाने होत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.