ज्ञानेश्वर फड/एम. डी. पाखरे
आळंदी –
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ।
तया नमस्कार वारंवार ॥
न पाहे यातीकुळांचा विचार ।
भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥
भलतिया भावें शरण जातां भेटी ।
पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ।
एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥
कृपाळू, उदार, भक्त करुणाकर, अनाथाची माय, ज्ञानियांचा राजा, योग्यांची माऊली… अशा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना नमस्कार करण्यासाठी त्यांचे दर्शन करण्यासाठी, अनुपम्य अलौकिक कार्तिकी वारी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक वारकरी देश-राज्याच्या कानाकोपर्यातून तीर्थक्षेत्र आळंदीत दाखल झाले होते.
दशमीच्या दिवशी सायंकाळपासून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत पोहोचत होते. एकादशीच्या दिवशी पहाटेपासून भाविक वारकरी पवित्र इंद्रायणीचे स्नान करून नगरप्रदक्षिणा करत होते. हातामध्ये उंच उंच वारकरी पताका, गळ्यात टाळ, वीणा मृदंग घेऊन त्याच्या तालावर गोड अभंग गात, ज्ञानोबा… तुकारामचा गजर करत शेकडो दिंड्यानी नगरप्रदक्षिणा केली.
इंद्रायणी घाटावर येताच वारकर्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारल्याचे दिसून येत होते. 80 ते 90 वर्षांचे वारकरी तरुणांना लाजवेल अशा अवस्थेत देहभान विसरून हरीनामात तल्लीन झाले होते. फुगड्यांचा फेर, पाऊली असे विविध वारकरी खेळ इंद्रायणी घाटावर रंगले होते. छोटे बालक ते शंभरी पार केलेले अशा सर्वांनी कार्तिकी वारी सोहळ्याचा आनंद घेतला.
पहाटेच्या महापुजेदरम्यान सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला.
जालन्यातील शेतकरी दामप्त्याला महापुजेचा मान
दर्शनबारितील पहिल्या दाम्पत्याला एकादशीनिमित्त माउलींच्या महापुजेचा मान दिला जातो त्याप्रमाणे यावर्षी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील परतवाडी गावातील शेतकरी दाम्पत्य शेषराव सोपान आडे (वय 60), गंगुबाई शेषराव आडे (वय 55) यांना हा मान मिळाला. विशेष म्हणजे 2021 सालीही त्यांना हा मान मिळाला होता. पहाटे 2 वाजताच्या सुमारास महापूजा पार पडली. संपूर्ण जगाला सुखी समाधानी ठेव, पाऊस पाणी चांगले पडुदे, शेतकरी सदा सर्वकाळ सुखी राहूदे असे मागणे त्यांनी माऊलींकडे मागितले. हे वारकरी गेली 30 वर्षांपासून आळंदी पंढरपूरची वारी करतात.
माऊलींचे देखणे रुप
केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त अॅड.विकास ढगे पाटील, भावार्थ देखणे, योगी निरंजननाथ, अॅड. राजेश उमाप यांसह आळंदीकर ग्रामस्थ, पोलीस अधिकारी तसेच आदी भाविक उपस्थित होते.
माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा
दुपारी 1 वाजताच्या दरम्यान माउलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा झाली. यावेळी प्रदक्षिणा रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी होती. हजारो भाविकांनी पालखीचे स्पर्श करून तसेच डोळ्यात भरून दर्शन घेतले.
आज मंदिरात होणारे कार्यक्रम
कार्तिक वद्य द्वादशी, वार रविवार दिनांक 10 रोजी पहाटे 2 ते 3. 30 पवमान अभिषेक व दुधारती, पहाटे 3. 30 ते 4 खेड प्रांताधिकार्यांच्या हस्ते पंचोपचार पूजा, पहाटे 3 ते 6 मुक्ताई मंडपात नांदेडकर मंडळींची दिंडी क्र.15 यांच्यातर्फे काकडा भजन सेवा. सकाळी 5 ते 11.30 श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य, दुपारी 4 ते 7 रथोत्सव पार पडणार आहे. दुपारी 4 ते 6 वीणा मंडपात हरिभाऊ बडवे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 9 ते 11 वीणा मंडपात केंदूरकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 11 ते 12 पासधारक, खिरापत पूजा, प्रसाद वाटप- वीणा मंडप, श्रींच्या गाभार्यात फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप.