पिंपरी – निगडी ते तळवडे मार्गावर आणि मोशी-चिखली-तळवडे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे तळवडे एमआयडीसी व आयटी पार्कमधील नोकरदार, कामगार तसेच त्रिवेणीनगर, तळवडे, रुपीनगर आदी परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. परंतु महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाच्या नाकर्तेपणामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना अक्षरशः जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग लवकरात लवकर सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली आणि तळवडे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यातून डीपी मार्ग विकसित करण्याचा निर्णय झाला. परंतु ही बैठक होऊन काही महिने उलटले तरी अद्याप कामाला गती मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे निगडी-तळवडे आणि मोशी- चिखली -तळवडे मार्गावरील वाहतूक कोंडी वाढत आहे. महापालिका प्रशासनाने येथील जमीन लवकरात लवकर संपादन करून पर्यायी मार्ग तयार केल्यास या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
अग्निशामक, रुग्णवाहिका येण्यास उशीर
शुक्रवारी (दि. 8) तळवडे येथील शोभेचे फटाके बनविणार्या कंपनीला आग लागली. तेव्हा तळवडे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अग्निशामक दलाची वाहने व रुग्णवाहिका वेळेत पोहचल्या नाहीत. त्यामुळे मोठी हानी होऊन अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला. अक्षरशः काही जखमी रुग्णांना खासगी वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे महापालिकेने पर्यायी मार्गांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
वाहतूक विभागाचा नियोजनशून्य कारभार
निगडी-तळवडे मार्गावर तळवडे, एमआयडीसी, महाळुंगे, चाकण, खराबवाडी, भामचंद्र गडाच्या पायथ्याशी असणार्या औद्योगिक कंपन्या, आंबेठाण आदी परिसरातील अवजड वाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे तळवडे चौकात वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस, वॉर्डन यांची चौकाचौकांत नियुक्ती करणे गरजेचे आहे. परंतु वाहतूक विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने वाहतुकीचे नियोजन करणे अशक्य होत आहे. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
वारंवार घडतात अपघात
निगडी- तळवडे-चिखली मार्गावर दररोज वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना अपघात घडत आहेत. शनिवारी (दि. 9) तळवडे चौकात एका महिला दुचाकी चालकाला अपघात घडून अवजड वाहनाखाली आल्याने आपला जीव घमवावा लागला आहे. महापालिका प्रशासन अजून किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिक करत आहेत.
महापालिकेने तळवडे मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी डीपी मार्ग विकसित करणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेने रेडझोन हद्दीतील शेतकर्यांना इतर शेतकर्यांप्रमाणे मोबदला दिला तर येथील शेतकरी त्वरित जमिनी देऊन रस्त्याचा मार्ग मोकळा होईल. परिणामी निगडी तळवडे मार्गावरील वाहतूक कोंडी सुटेल. तसेच निगडी-तळवडे मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस व वॉर्डनची प्रत्येक चौकात नियुक्ती करावी. परिणामी अपघात व वाहतूक कोंंडी होणार नाही.
– प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक.
त्रिवेणीनगर चौकातील स्पाइन रोडचे काम लवकरात लवकर करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा. तसेच चिखली तळवडे शीव रस्त्यातील बाधित शेतकऱ्यांना जमीन, घरांचा योग्य मोबदला देऊन हा मार्गा वाहतुकीसाठी त्वरित खुला करावा. तसेच तळवडे रस्त्याला असणारे सव पयायी रस्ते ताब्यात घे/न वाहतूक कोंडी सोडवावी.
– संगीता ताम्हाणे, माजी नगरसेविका.