पाथर्डी -यंदा पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील डोंगराळ भागात दुष्काळाची भीषणता असल्याने तत्काळ टॅंकर व चारा डेपो सुरू करा, अशी मागणी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे. यामध्ये प्रामुख्याने डोंगरपट्टा असलेल्या शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी, मोहरी, मोहटा, माणिकदौंडी, पिरेवाडी, जाटदेवळा, बोरसेवाडी, चितळवाडी, लांडकवाडी, आल्हणवाडी, घुमटवाडी, पत्र्याचा तांडा, धनगरवाडी या भागामध्ये पाण्याचा कुठलाही शाश्वत स्रोत नाही. यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा याचा तुटवडा सुरू झाला आहे. खरिपाची पिके जळून गेली असून, रब्बीचा हंगाम धोक्यात आहे. तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
जूनपासून पिण्याच्या पाण्याचे सुरू असलेले टॅंकर सप्टेंबरअखेरपर्यंत सुरू होते. ऑक्टोबरमध्ये पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी सुरू झाली आहे. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करून तत्काळ टॅंकर व चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी पालवे यांनी केली आहे.