जामखेड – जामखेड तालुक्यात अनेक शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. कृषी, महसूल, महावितरण व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाहीत. दुधाला भाव व कांदा निर्यात उठवली पाहिजे, अधिकाऱ्यांनो शेतकर्यांचे रक्त पिण्याचे काम बंद करा, अन्यथा जामखेड तालुक्यात पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख मंगेश आजबे यांनी दिला.
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शासनाला शेतकर्यांचा आक्रोश दिसावा, यासाठी आज सकाळी जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील खर्डा चौकात आक्रोश मोर्चा व रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, भिमराव पाटील, काकासाहेब चव्हाण, गणेश हगवणे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नय्युम शेख, मा. सरपंच कृष्णा चव्हाण, बापूसाहेब शिंदे, माजी सरपंच नीलेश पवार, दत्तात्रय साळुंके यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगेश आजबे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा. मार्केट कमिटीच्या बाहेर आडती चालतात, त्यांना बाजार समितीमध्ये जागा देण्यात यावी तसेच आडत दुकानांमध्ये काटा मारण्याचे काम होत आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केली आहे ती उठवण्यात यावी,शेतकर्यांच्या दुधाला भाव मिळत नाही, तालुक्यातील खासगी कॉन्ट्रॅक्टरकडून होणारी शेतकर्यांची लूट थांबली पाहिजे.
विविध आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले की, जामखेड नगरपरिषद हद्दीतील वाड्या-वस्त्यांमधील शेतकरी शासनाच्या विविध योजनांमधून वगळले आहेत. त्यामुळे त्यांना कृषी व पंचायत समितीच्या योजना मिळत नाहीत, या योजना त्यांना त्वरीत लागू कराव्यात. जामखेड तालुक्यातील मागील वर्षी तालुक्यातील ३४ गावे ही अनुदानापासून अजूनही वंचित राहिले आहेत, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार मनोज भोसेकर व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्तारोको आंदोलनात मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.