नगर – मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग मराठवाड्यात सर्वाधिक आहे. तेथे काही प्रमाणात परिवहन मंडळाच्या एसटी बसेसवर दगडफेक झाली. त्यामुळे नुकसान होऊ नये, म्हणून नगर जिल्ह्यातील आगारातून मराठवाड्यात व मराठवाड्यातून विदर्भात जाणाऱ्या बस च्या 63 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा फटका एस. टी. महामंडळाला बसला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. गावोगावी उपोषण व काही ठिकाणी उग्र आंदोलनेही होत आहेत. यातच मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत आंदोलकांनी परिवहन मंडळाच्या बसेसला लक्ष्य केले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तारकपूर, माळीवाडा, कोपरगाव आगारातून मराठवाड्यात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, सोमठाणा, जालना, माहूर, नांदेड या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील तीन पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकुण 63 फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख यांनी दिली.
मराठवाड्यातून विदर्भात व हैदराबादला जाणाऱ्या बस देखील बंद केल्या आहेत. कुठलीही पूर्व कल्पना प्रवाशांना नसल्याने त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशी खासगी वाहनातून जात होते. काही जणांनी आपला प्रवास लांबणीवर टाकला आहे. अहमदनगर जिल्ह्यांतर्गत तसेच पुणे, मुंबई व इतर ठिकाणच्या बसेस सुरू आहेत. तर तारकपूर आगारातून पाच बसेचच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रविवारी व सोमवारी सकाळपासून बीड जिल्ह्यात जाणाऱ्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. बीड पोलिसांकडूनच तसे पत्र आले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत या फेऱ्या बंद राहतील.
मुकुंद नगराळे, प्रभारी विभाग नियंत्रक
जिल्ह्यातील फेऱ्यांवरही परिणाम
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याकडे जाण्यासाठी बीड हद्दीतूनच जावे लागते. जामखेडला जाण्यासाठी आष्टीहून मार्ग आहे. त्यामुळे जामखेडकडे जाणार्या फेर्याही रद्द कराव्या लागल्या आहेत. याशिवाय नगर जिल्ह्यातील अनेक आगारांतून बीडच्या नजीकच्या हद्दीत बस सुरू होत्या. त्याही बंद करण्यात आल्या आहेत.