मनोज जरांगे यांना पाठींबा तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी साखळी, आमरण उपोषण सुरू आहे. तर आजूनही आरक्षण मिळत नसून जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याने मराठा समाज ठिकठिकाणी आक्रमक झाला असून त्याची धग आता बसायला सुरुवात झाली आहे.
प्राणांची आहुती द्यायचीही तयारी
आळंदीत मराठा समन्वयक काकडे यांचे आमरण उपोषण सुरू
आळंदी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आळंदीत 26 ऑक्टोबरपासून महाद्वार चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले आहे. यावेळी आळंदीतील सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि रविवारी (दि. 29) शोले स्टाइलने आंदोलन करणारे मराठा युवक श्रीकांत काकडे यांनी सोमवार (दि. 30) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी प्राणांची आहुती द्यायची तयारी असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.
या उपोषणाबाबत सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर व आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी डि. डि. भोसले पाटील, रोहीदास तापकीर, रमेश गोगावले, संतोष तुळशीराम भोसले, मच्छिंद्र शेंडे, अरुण कुरे, निसार सय्यद, बालाजी शिंदे, रमेश तौर, मारुती साळुंके, रामदास साळुंके, विलास कुऱ्हाडे उपस्थित होते.
श्रीकांत काकडे म्हणाले की, आरक्षणासाठी शांततेत 57 महामोर्चे काढले. गेल्या दोन महिन्यांपासून मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करित आहे. मराठा समाजाने खूप मोठा त्याग केला आहे.
मराठा समाजातील सर्वसामान्यांचे तरुण आत्महत्या करून आपला जीव गमावू लागले आहेत. गरजवंत मराठ्यांचा हा लढा अराजकिय आहे. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मनोज जरांगे-पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा अखेरच्या क्षणांपर्यंत लढत रहाणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही.