नगर – शहरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांचे भवितव्य मटका, बिंगो, जुगार, तंबाखू, गुटखा, मावा अशा व्यसनाभोवती अडकविले जात आहे. सरकार स्वतः शासन निर्णय काढून गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचा केवळ दिखावा केला. मात्र प्रत्यक्षात पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे, असा आरोप शहर कॉंग्रेसचे किरण काळे यांनी केला आहे.
हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घालून देखील सीताराम सारडा विद्यालयाच्या 100 मीटर आवारात ते पान स्टॉल पुन्हा सुरु झाले आहे. कुलकर्णी यांच्यावर हल्ला होऊन दोन आठवडे होत नाही तेच पुन्हा शाळेच्या आवारात राजरोसपणे पान टपऱ्या सुरू आहेत.
याबाबत शाळा परिसर तंबाखूमुक्त करून मुलांना खुल्या वातावरणात श्वास घेऊ द्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना कॉंग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देत चर्चा केली. प्रशासन पुन्हा हत्याकांड होण्याची वाट पाहत आहे काय? असा संतप्त सवाल काळे यांनी प्रशासनाला केला.यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, सुनील क्षेत्रे, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाणसह कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस, मनपा तसेच अन्न व औषध विभाग परस्परांकडे बोट दाखवीत असून कोणी ही यावर सक्षमपणे कारवाई करण्यास तयार नाही. केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याचे ते म्हणाले.
मंत्र्यांच्या कार्यालयासमोर करणार आंदोलन!
पुढील 48 तासांच्या आत कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. कारवाई न झाल्यास येत्या सोमवारी पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयासमोर कॉंग्रेसच्या वतीने ढोल बाजाओ आंदोलन करण्यात येईल. तसेच नगरमध्ये शिक्षण मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही,असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.