रहिमतपूर – येथे रहिमतपूर नगरपरिषदेच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे पूजन भाजपच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने- कदम यांच्या हस्ते व मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ रहिमतपूर येथे आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तत्कालीन विरोधी पक्ष नेते नीलेश माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या रथाचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभांसंदर्भात अजय पाटणकर यांनी माहिती दिली. सौ. चित्रलेखा माने- कदम म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या आयुष्यमान कार्ड, मुक्त गॅस कनेक्शन, किसान क्रेडिट कार्ड, पी. एम. आवास योजना अशा विविध योजना महिला व नागरिकांसाठी आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार तळागाळातील लोकांना सशक्त व सक्षम करीत आहे. या विविध योजनांचा लाभ अनेकांना मिळाला आहे. यापुढेही मिळणार आहे. सरकार आपल्या दारापर्यंत येऊन बरेच काही देऊ पाहते आहे. ते आपणाला घेता आले पाहिजे. यासाठी महिला व नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकत अशा विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेतला पाहिजे.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत ५५० लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये लाभ दिल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमृता दीक्षित यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२७ लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे अभियंता अभिजित कोळेकर यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री उज्वल योजनेअंतर्गत १२५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १८०० लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप केल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलम मदने यांनी सांगितले. यावेळी मोनिका पाटील, उमेश घाडगे, सुजित आमने, माऊली घाडगे, दत्तात्रय राणे आदी उपस्थित होते.