तळेगाव दाभाडे (मनोहर दाभाडे) – महिलांचा मेकअप, तरुणांचे नृत्य व फोटोग्राफरची ॲक्शन मध्ये फोटो काढण्यासाठी धडपड यामुळे लग्नाचा मुहूर्त टळून जातो. त्यामुळे उपस्थित वऱ्हाडी मंडळी त्रस्त होतात.
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरूवात होते. सध्या गंध लावणे, साखरपुडा, हळद लावणे हे कार्यक्रम शक्यतो लग्नाच्या आधी होतात. ही आनंदाची बाब असली तरी ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागणे ही बाब वधू–वरांसाठी शुभ असते. लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमात वऱ्हाडी मंडळींमध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. लग्नात नटणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु, त्यास होणारा विलंब हे देखील विवाह मुहुर्तावर लग्न न लागण्याचे एक कारण आहे. अनेकदा नवरदेवाचे विवाहस्थळी प्रवेशद्वारावर आगमन झालेले असताना देखील नवरी मुलगी ब्युटी पार्लरच्या महिलेकडून मेकअप करून घेत असते. अशा घटना सध्या वेळोवेळी निदर्शनास येताना दिसत आहे.
दुसरा मुहूर्तला उशिर होण्याचे दुसरे कारण म्हणजे नवरदेवाच्या परण्याच्या मिरवणुकीत ठेवलेली डीजे सिस्टीम व त्यावेळी वराच्या प्रेमा खातर नाचणारी मित्रमंडळी यांना अनेकदा सांगून देखील ते विवाहाच्या ठिकाणी येण्यास उशीर करतात. त्यामुळे विवाह मुहूर्त टळून जातो, असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
तिसरे कारण म्हणजे व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफ करणाऱ्या कलाकारांचा वधू आणि वर यांच्या घरातून निघण्यापासून ते विवाहस्थळी पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या पोजमध्ये उभे करून फोटो काढून शूटिंग घेतले जाते. त्यांच्या या पोजमुळेही विवाह मुहुर्तावर लग्न लागत नाहीत.
चौथे आणि प्रमुख कारण म्हणजे वधू–वर विवाह स्थळी आल्यानंतर आलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत करणे. तसेच मान्यवरांचा सन्मान करणे. तसेच एखाद्या व्हीआयपीचा वाट पाहात बसणे, यामुळे दखील लग्नाचा मुहुर्त टळून जातो.
करोना काळातील लग्नच चांगली होती
करोनाचे संकट जगावरती आले होते. त्यावेळी मर्यादित वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळे होत होते. त्यावेळी ना महिलांकडून मेकअप अटटाहास होता ना युवकांचा नाच, ना राजकीय नेत्यांचा सन्मान होता. त्यामुळे विवाह अगदी मुहुर्तावर लागत होते. त्यातून सोहळे साजरे करताना मिळालेली शिकवण व अनुभव अंगीकारले तर निश्चितच सर्वांचा फायदा होईल.