राहुरी : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबपासून राज्यभर बेमुदत संप सुरू केला आहे. मात्र, अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. या घटनेच्या निषेधार्थ आज राहुरी येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करत महसूल प्रशासनाला निवेदन दिले.
राज्यासह राहुरी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्यभर बेमुदत संप सुरु केला. आज राहुरीत महिला कर्मचाऱ्यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी महिलांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा. कर्मचाऱ्यांना मानधन नको तर वेतन द्या, अशा मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
अंगणवाडी कर्मचारी गेल्या ४८ वर्षांपासून कुपोषण निर्मूलनाचे काम करत आहेत. ४० वर्षे सातत्याने सरकार दरबारी लढा देऊन प्रचंड महागाईच्या काळात अंगणवाडी सेविका १० हजार, मिनी अंगणवाडी सेविका साडेसात हजार व मदतनीस साडेपाच हजार रुपये मानधन पर्यंत पोहचल्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाप्रमाणे महत्वाचे आहे. परंतु, शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नेहमीच सावत्रपणाची वागणूक देत आले आहेत, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
अंगणवाडीसेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार व मदतनीसांना २० हजार रुपये दरमहा वेतन द्यावे. महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानसार वाढ करावी. नगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांना ५ हजार ते ८ हजार भाडे मंजूर करावे, आदी मागण्या तातडीने मान्य कराव्यात. तोपर्यंत संप चालूच राहील., असा निर्णय यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतला. या मोर्चात महिला अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.