नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. पावसाला अद्याप दमदार सुरुवात झाली नसली तरी पावसाळा म्हटला की पूरही ओघाने आलाच. या दिवसात पुराचे संकट निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील 223 नदीकाठच्या गावांना संभाव्य धोका लक्षात घेता ही गावे पूरप्रवण म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या गावांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील गोदावरी, मुळा, प्रवरा, भीमा, घोड, सीना, खैरी, म्हाळुंगी या नदीकाठच्या 223 गावांत पूर येण्याचा धोका असल्याने प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात सन 2020 मध्ये सरासरी 767 मिलीमीटर पाऊस झाला होता. पावसामुळे नद्यांना पूर आल्यानंतर दुर्घटना घडल्यास खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाकडे शोध व बचाव कार्यासाठी सात बोट आहेत. यामध्ये पाच रबर बोट व दोन फायबर बोट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पूर परिस्थिती निर्माण होणारी गावे
गोदावरी नदी काठावरील कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासा व शेवगाव तालुक्यातील 40 गावे, प्रवरा नदीकाठावरील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातील 100 गावे, मुळा नदी काठावरील राहुरी व नेवासा तालुक्यातील 24 गावे, भीमा नदीकाठावरील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील 20 गावे, घोड नदीकाठावरील श्रीगोंदा तालुक्यातील 11 गावे, सीना नदीकाठावरील नगर, कर्जत, जामखेड तालुक्यातील 20 गावे, खैरी नदीकाठावरील जामखेड तालुक्यातील 5 गावे आणि म्हाळुंगी नदीकाठावरील संगमनेर तालुक्यातील 3 गावांचा समावेश आहे.
पावसाळ्याच्या दिवसात नदीकाठच्या गावांना नेहमीच पुराचा धोका असतो. ज्या गावांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे त्या गावांना जोखीमग्रस्त गावांच्या यादीत टाकले असून पावसाळ्यात या गावांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.