अकोले(प्रतिनिधी) – अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत चांगलीच चढाओढ सुरू झाला. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवट दिवसापर्यंत 21 जागांसाठी तब्बल 287 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची साथ सोडत माजी जि. प. बांधकाम सभापती कैलास वाकचौरे यांनी सीताराम गायकर, मधुकरराव नवले यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत अकोले उत्पादक गटातून अर्ज दाखल केला. तर शेतकरी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत व बी. जे. देशमुख यांनी बैलगाडी मिरवणुकीने येत आपल्या पॅनेलचे अर्ज दाखल केले.
अगस्ती कारखान्याची 17 जुलैला निवडणूक होत आहे. आज (सोमवार) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 113 अर्ज दाखल झाले. एकूण 21 जागांसाठी 287 अर्ज दाखल झाले आहे. उद्या मंगळवारी सकाळी अर्जांची छाननी होणार असून, बाद अर्ज वगळता वैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अनुसूचित जाती जमाती व इंदोरी उत्पादक गट अशा दोन ठिकाणांहून अर्ज दाखल केले. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी सोसायटी मतदारसंघ व कोतूळ उत्पादक गट या दोन ठिकाणांहून अर्ज दाखल केले.
पिचड यांच्या आवाहनाला प्रतिसाद नाही
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनाला पुरेसा प्रतिसाद न मिळता 21 जागांसाठी तब्बल 287 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र सध्या आहे. अजूनही माघारीसाठी 6 जुलैपर्यंत मुदत आहे. मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
कैलासराव वाकचौरे यांनी अकोले उत्पादक गटातून व तिसर्या पॅनेलचे नेते दशरथ सावंत यांनी इंदोरी गटातून व बी. जे. देशमुख यांनी कोतूळ गटातून, आ. डॉ. किरण लहामटे यांचे वडील यमाजी लहामटे यांनी कोतूळ व अनु.जाती-जमाती गटातून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी अनु. जाती/जमाती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले व त्यांचे पुत्र विक्रम नवले यांनी अकोले गटातून, विद्यमान उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, महेशराव नवले, मीनानाथ पांडे यांनी इतर मागासप्रवर्ग गटातून अर्ज दाखल केले आहे.
अगस्ती कारखान्यात यापूर्वी 19 संचालक होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी अगस्तीच्या गाळप क्षमतेत 2500 वरून 3500 मेट्रिक टनाची वाढ केल्याने कोतूळ व देवठाण गटातून 2 संचालकांची वाढ झाल्याने आता संचालकांची संख्या 21 झाली आहे. तर एकूण 5 गटातून ही निवडणूक होईल. पैकी अकोले गटातील 10 गावात 1209, इंदोरी गटात 30 गावांतून 1876 मतदार, आगर गटातील 30 गावांतून 1928 मतदार, कोतूळ गटातून सर्वाधिक 60 गावे 1996 मतदार आहेत. तर देवठाण गटात एकूण 25 गावांचा अंतर्भाव असून 1341 मतदार आहेत. असे एकूण 8342 मतदारांवर भावी संचालकांची भवितव्य अवलंबून आहे. यात सुमारे 3 हजार 300 आदिवासी शेतकरी मतदार असून उर्वरीत बिगर आदिवासी ऊस उत्पादक सभासद आहेत.