संगमनेर (प्रतिनिधी) -अहिल्यादेवी होळकर एक तत्वनिष्ठ, आदर्शवादी, शूर, सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे जीवन कार्य पुढील अनेक पिढ्यांसह देशाला मार्गदर्शक ठरत असल्याचे गौरवोद्गार थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी काढले आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पी. वाय. दिघे, संतोष कर्पे, नामदेव कहांडळ, राजू वाकचौरे, अजित सरोदे, अजित मोकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
ओहोळ म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांचे संपूर्ण जीवन कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन शौर्य, समाजसुधारणा, आदर्श राजकारण, न्याय, सर्व धर्म समभाव जपणारे आहे. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले असून, ब्रिटिश लेखकांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. धर्मशाळा, विहिरी, बारव याचबरोबर केदारनाथ मंदिर त्यांनी उभे केले. त्यांच्या जीवनाला संत हे विशेषण सार्थ आहे. त्यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर या उत्तम प्रशासक होत्या. गुलामगिरीच्या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले. सरकारने त्यांच्या या विचारांचे अनुकरण केले पाहिजे. आरक्षणाबाबत धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे. अलौकिक व्यक्तिमत्व असणाऱ्या अहिल्यादेवींचे एक चांगली स्मारक व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.