कोपरगाव (प्रतिनिधी) -मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगावातील सामाजिक संघटनांनी कोपरगाव रक्तदान कर्तव्य सोहळा शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 555 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
हे शिबीर शहरातील कलश मंगल कार्यालयात शासनाच्या सूचनांचे पालन करून घेण्यात आले. राजेश ठोळे, संदीप कोयटे, अरविंद भन्साळ, राहुल अमृतकर, सुनील फंड यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमात नगर येथील आनंदऋषीजी ब्लड बॅंक, श्री साईबाबा संस्थान रक्तपेढी, संजीवनी ब्लड बॅंक, अर्पण ब्लड बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विशेषत: कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत नागरे या अधिकाऱ्यांनीही यावेळी रक्तदान केले. तसेच पोलीस, जवान, डॉक्टर, नगरपालिका विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे येऊन रक्तदान केले.
या प्रसंगी रक्तदात्यांमध्ये कोपरगाव शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता. या शिबिरात 555 पिशव्या रक्त संकलन झाले. या रक्तदान कर्तव्य सोहळ्यास समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, बॅंकिंगतज्ज्ञ कैलास ठोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोयटे म्हणाले, रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळते. त्यामुळे हे पुण्याचे काम असून, आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी रक्तदान केले पाहिजे. तसेच सध्या निर्माण झालेल्या करोना महामारीशी चांगल्याप्रकारे कोपरगावकर संघर्ष करीत असून, येथून पुढेही स्वत: समवेत परिवाराची, शेजाऱ्यांची, गावाची, तालुक्याची,जिल्ह्याची, देशाची काळजी आपल्याला घायची आहे, असे आवाहन केले.
या प्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी येऊन भेट दिली. शिबीर यशस्वितेसाठी भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समूह, समता चॅरिटेबल ट्रस्ट, सोनतारा भन्साळी ट्रस्ट, साईबाबा पालखी सोहळा यांच्यासह कोपरगाव शहरातील अठरा पगड जातींतील अनेक सामाजिक संघटना, संस्था, गणेशोत्सव मंडळे यांनी सहभागी होऊन सामाजिक एकतेचा एक आदर्श देशासमोर ठेवत विशेष परिश्रम घेतले.