पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आर्थिक काटकसर करण्यासाठी राज्य शासनाने शिक्षक भरतीला बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होण्याची शक्यता कमी आहे.
मागील काही वर्षांमध्ये विद्यार्थी संख्येबरोबरच शाळांची संख्याही वाढली होती. मात्र या बरोबरच विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही. सन 2012 पासून राज्यात सहा-सात वर्ष शिक्षक भरती बंदच ठेवली होती. डी.एड., बी.एड. झालेल्या बरोजगार उमेदवार, संघटना यांनी शासनाकडे अनेकदा शिक्षक भरती करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने गेल्या दीड वर्षापूर्वी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू केली.
त्यातून 12 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचे नियोजन करून त्याची सुरुवात केली होती. यातील 6 हजार उमेदवारांना आतापर्यंत शाळांमध्ये नियुक्त्या मिळाल्या आहेत. सन 2012 नंतरच्या शिक्षकांना “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार आतापर्यंत “टीईटी’ च्या सहावेळा परीक्षा घेतेल्या आहेत. आतापर्यंत 69 हजार 706 उमेदवार परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 19 जानेवारी 2020 रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. या परीक्षेला 3 लाख 43 हजार 283 उमेदवारांनी नोंदणी केली होती.
राज्यातील विविध ठिकाणी करोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने लॉकडाऊनही वाढत आहे. शासनाच्या तिजोरीवर विपरित परिणाम झाले आहे. मोठे आर्थिक संकट उभे असल्याने शासनाने नवीन पद भरती करण्यास निर्बंध घातले आहेत. त्याबाबतचे आदेशही गेल्या महिन्यातच जारी केले आहे.