नवी दिल्ली – भारताच्या जागतिक उदयात कृषी क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे प्रामुख्याने कृषी आणि कृषी आधारित उद्योगामुळे होत असून भारत जागतिक अर्थव्यवस्थेत एक उगवता तारा आहे, असे गौरवोद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
भारतीय कृषी संशोधन संस्थेचा 61वा दीक्षांत समारंभ जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या प्रगतीसाठी कृषीशिक्षण, संशोधन, अभिनव प्रयोग केंद्रस्थानी असायला हवेत अशी, अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
जगदीप धनखड म्हणाले, देशाच्या सर्वांगीण विकासात अन्नदात्याच्या व्यापक योगदानाची यथोचित दखल घेतली. जेव्हा संपूर्ण जग, कोविडच्या संकटाचा सामना करत होते, अशा स्थितीत सुद्धा देशातील 80 कोटी लोकांच्या अन्नसुरक्षेची जबाबदारी समर्थपणे कृषी क्षेत्राने पार पाडल्याचे धनखड म्हणाले.
“आज प्रत्येकजण जो भारत पाहत आहे तो अद्भुत आहे. भारताचा उदय न थांबवता येणारा आहे. केंद्र सरकारने अशी इकोसिस्टम विकसित केली असून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सकारात्मक धोरणे राबवित आहे. यामुळे भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल.
– जगदीप धनखड, उपराष्ट्रपती
कृषीव्यवस्था हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. जगभरातील कृषी क्षेत्रासाठी हा उपक्रम किती महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. आज कृषी क्षेत्रात ड्रोनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर, बदलत्या काळानुरूप या क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले.