हिंगोली : परिसरातील शेतकऱ्यांनी गावातले पाणी गावात आणि शेतातले पाणी शेतात जिरवून जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविल्यास तो समृद्ध होईल, अन्नदाता शेतकरी उर्जादाता बनावा यासाठी आपला प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगोली येथे केले. विविध रस्ते प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. येथील रामलीला मैदान येथे वाशिम-पांगरे चौपदरी मार्ग प्रकल्पाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या भागातला शेतकरी समृध्द झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. स्मार्ट शहरे नाही तर स्मार्ट गावे झाली पाहिजेत. तरुण मुलांना मुंबई-पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. यासाठी आपल्या जिल्ह्यात काम मिळाले पाहिजे. या भागाचा ग्रोथ रेट वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
वाशिम व हिंगोलीच्या विकासासाठी जे जे काही करता येईल ते करु, असे सांगून शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे असे ते म्हणाले. शेतकरी उर्जादाता व्हावा यासाठी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिजेल, बायोसीएनजी इलेक्ट्रीक, हायड्रोजन यासारखे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी सुजलाम, सुफलाम होईल.
आपल्या भागात हळदीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. या भागात रस्त्याच्या बाजूने शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्यास ११०० कोटी रुपये खर्च करुन हळदीच्या कल्स्टरसाठी लॉजिस्टीक पार्क उभारण्यास १०० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. येथे हळदीपासून विविध उत्पादने निर्माण केल्यास आपली हळद जगाच्या नकाशावर येऊन साता समुद्रापलीकडे जाईल असा विश्वास दिला. सध्या जालना येथे एक्सपोर्ट-इम्पोर्ट सुरु होणार आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
हिंगोली जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी जलसंवर्धनाची कामे झाली पाहिजेत. यात ब्रीज कम बंधारे झाले पाहिजेत. या माध्यमातून नदी, नाल्याचे खोलीकरण करुन गावातले पाणी गावात, घरातले पाणी घरात, शेतातले पाणी शेतात जिरले पाहिजे. तसेच नदी नाल्याचे खोलीकरण करुन पाणी साठवण क्षमता वाढवली पाहिजे. यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल. प्रशासनाने देखील जलसंवर्धनाच्या कामास प्राधान्य दिले पाहिजे, असे देखील ते म्हणाले.