पुणे – राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना बी.एस्सी. ऍग्री (ऑनर्स) या पदवी अभ्यासक्रमाच्या समकक्षतेचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.पदवी अभ्यासक्रमाच्या नावांमध्ये बदल झाल्याने, कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा; तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या परीक्षा देण्यात अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर शासन निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यामार्फत कृषी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे.
त्यामुळे या पदवी अभ्यासक्रमांच्या नामामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. मात्र, यामुळे कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पदवीची समकक्षता देण्याचा निर्णय कृषी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
या पदवी अभ्यासक्रमांमध्ये बी.एस्सी. उद्यानविद्या, बी.एस्सी. वनविद्या, बी.एस्सी. सामाजिक विज्ञान, बी.एफ.एस्सी. ( मत्स्य विज्ञान), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक. (अन्नतंत्रज्ञान), बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.एस्सी. (एबीएम)/ बीबीएम (कृषी)/ बी.बी.ए (कृषी), बी.एस्सी. कृषी व्यवसाय व्यवस्थापन यांचा समावेश आहे.