कराड – कराडमधील काही ठेकेदारांकडून टेंडर मिळवण्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव आणून शासनाच्या निकषांना हरताळ फासण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कंपन्यांच्या बोगस लेटरपॅडचा वापर करून टेंडर भरल्याचा प्रकारही समोर आला आहे. याप्रकरणी पालिका प्रशासनाने संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करावेत. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कराडकर नागरिकांच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
यावेळी आपले कराड ग्रुपचे संजय चव्हाण, दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माने, शंभूराज रैनाक, सुलोचना पवार, प्रताप इंगवले उपस्थित होते.
याप्रसंगी माहिती देताना संजय चव्हाण म्हणाले, “राज्य शासनाने रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी निविदा प्रक्रियेत काही अटी व शर्ती घातल्या आहेत. परंतु, या अटी व शर्ती शिथिल करण्यासाठी काहींकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मात्र, दर्जेदार कामे हवी असतील; तर शासनाच्या निकषांचे पालन होणे गरजेचे आहे. यामुळे त्याच-त्या रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा अनावश्यक खर्च शासनाला करावा लागणार नाही. तसेच शहरात खडीकरण व डांबरीकारण झालेले रस्ते दोन- चार महिन्यांतच खराब झाले असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निविदेतील सर्व अटींचे पालन करून दर्जेदार काम करणाऱ्या ठेकेदारांनाच यापुढे कामे देण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.
प्रमोद पाटील म्हणाले, “काही ठेकेदारांनी कामे मिळवण्यासाठी कंपन्यांच्या बोगस लेटरपॅडचा वापर करून टेंडर भरली आहेत. याप्रकरणी ईगल इन्फ्रा कंपनी, तसेच जे. पी. कंट्रक्शन कंपनीने पालिकेला पत्र पाठवून कंपनीच्या नावाने बोगस लेटरपॅड तयार करून टेंडर मागणी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे कळवले आहे. त्याचबरोबर खोडसाळपणाने प्रशासनास नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने दुसऱ्या व्यक्तीने बोगस लेटरपॅड वापरुन हा प्रकार केला आहे. त्यामुळे ही मागणी आम्ही केलेली नसून या मागणीचा विचार करण्यात येऊ नये, तसेच पालिकेने संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही कंपन्यांकडून पत्राद्वारे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कराड शहरातील काही रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून नागरिकांना धुळीचा त्रास होत असून काहींना श्वसनाचे विकारही जडले आहेत. यामुळे अशा माध्यमातून काही कामे स्वतःला मिळवून कामाचा दर्जा खराब करून नागरिकांना त्रास देण्याचा एकप्रकारे कटच रचला जात आहे. त्यामुळे पालिकेने पोलिसांनाही ही बोगसगिरी कळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा, याप्रकरणी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी कराडकर नागरिकांच्यावतीने दिला. तसेच ठेकेदारांना कामे देताना पालिकेने क्वालिटी कंट्रोलमार्फत सदर कामाची तपासणी करावी. दक्ष नागरिकही त्यांच्या पद्धतीने चौकशी करतीलच. परंतु, पालिका प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.