मुंबई : शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा तात्पुरता आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. या आयोगाच्या निर्णयामुळे अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातुन आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली.
आज औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “निर्णय हे गुणवत्तेवरून घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं. आता इथून पुढे निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे चिन्ह ठरवेल ते शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो, निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.”
आता शिवसेनेसमोर काय पर्याय असणार? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “आता नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची. मी स्वत: पहिली निवडणूक लढलो तेव्हा बैल जोडीवर लढलो होतो. दुसरी निवडणूक ही गाय-वासरू या चिन्हावर लढलो होतो. तिसरी निवडणुकीत चिन्ह चरखा होतं. चौथी निवडणूक हाताचा पंजा या चिन्हावर लढलो आणि आता घड्याळ हे चिन्ह आहे. एवढ्या वेगवेगळ्या चिन्हावर मी स्वत: लढलो आहे. आणि त्याचा काही फायदा होत नाही, लोक ठरवतात.”असे देखील यावेळी त्यांनी म्हटले.
तर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना संपणार का असा सवाल केला असता शरद पवारांनी “शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरूण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवतील.” असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच, “या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काहीच कारण नाही. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. हे कायम एकत्र राहतील, यात काहीच शंका नाही. आता जी पोटनिवडणूक आहे त्या निवडणुकीला काँग्रेसने पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला. ” असेही ते म्हणाले.
दोन्ही गटांना नवीन चिन्ह आणि नवीन नाव ठरवायचं आहे, यावर बोलताना शरद पवार यांनी “नावाबाबत मी कोण सांगणार, ते उद्धव ठाकरेच ठरवतील. उद्या शिवसेना(बाळासाहेब ठाकरे) असंही होऊ शकतं. तसेच, शेवटी सत्तेचा गैरवापर करून निवडणुका कोणी लढवत असेल तर लोकांना ते आवडत नाही.” असे पवारांनी यावेळी म्हटले.