मुंबई – महाराष्ट्रात सध्या कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा गोंधळ सुरु आहे. या रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध केला आहे. आजही सुरू असणाऱ्या रिफायनरी प्रकल्प सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. त्यावरून पोलीसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांडया फोडत, आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज देखील करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी कोणताही लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटलं आहे. तसेच, आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश होता असा दावा केला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “बारसूत सध्या शांतता आहे. बारसूत कोणातही लाठीचार्ज केला नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश आहे. बाहेरचे काही लोक आंदोलनस्थळी आल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणार नाही.
बारसूतील लोकांचा गैरसमज दुर करणार. स्थानिकांच्या समंतीनेच हा प्रकल्प पुढे नेणार. जोरजबरदस्तीने हा प्रकल्प करणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी शांतता राखावी. रिफायनरी झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळाणार.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.