पुणे – संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पाठोपाठ वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेच्या हद्दीत दाखल झाल्या. त्यामुळे पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कळस येथे केले, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि रवीद्र बिनवडे यांनी बोपोडी येथे केले.
दरम्यान, दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यास पुष्पहार अर्पण करत पालखीसोबत असलेल्या दिंडी प्रमुखांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा कळस येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिका हद्दीत आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, उपायुक्त किशोरी शिंदे, नगरसचिव योगिता भोसले, येरवडा-कळस क्षेत्रीय कार्यालय अधिकारी इंद्रायणी कचरे यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी आयुक्तांकडून दिंडीच्या प्रमुखांचे स्वागतही करण्यात आले. मात्र, त्यानंतर अवघ्या पाऊण तासाच्या अंतराने जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी बोपोडी येथे आली. परिणामी आयुक्तांना कळस येथून वाहतूक कोंडीमुळे पुढे जाता न आल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि रवींद्र बिनवडे यांना बोपोडी येथे पाठविण्यात आले. त्यांनी पालखीचे स्वागत केले.