पुढील आठवड्यात मुंबई येथे मुख्य सचिवांची बैठक घेणार – अजित पवार यांचे आश्वासन
पुणे – पूर्व पुण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित भामा-आसखेड पाणी योजनेचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर या योजनेशी संबंधित सर्व खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक पुढील आठवड्यात मुंबईत घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
भामा-आसखेड योजना तातडीने मार्गी लावण्यात यावी, यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी राज्य शासनास पत्र दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या वतीने आमदार अजित पवार यांनी या प्रकल्पाचा आढावा शनिवारी पुण्यात घेतला.
या बैठकीत प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निधी, काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अजूनही असलेले कालव्याचे शिक्के तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सुमारे 1 किलोमीटर रखडलेले जलवाहिनीचे काम या समस्या मांडण्यात आल्या. त्यावेळी पवार यांनी त्या सोडवण्यासाठी नेमके काय प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती घेतली.
त्यानंतर हा प्रकल्प तातडीनं मार्गी लागणे आवश्यक असल्याने या योजनेशी संबंधित पुनर्वसन विभाग, जलसंपदा विभाग, भूसंपादन विभाग, महसूल विभाग, नगरविकास विभाग या सर्व विभागांच्या सचिवांची तातडीची बैठक मुंबईत घेण्यात येईल, असे सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शक्य तितक्या लवकर ही बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.