नवी दिल्ली: कोविड-19 नंतरच्या युगात जागतिक पुरवठा साखळीमध्ये लक्षणीय बदल होणार आहे आणि भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांनी जागतिक व्यापारामध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलण्याकडे लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज केले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील विविध निर्यात संवर्धन परिषदांशी (ईपीसी) चर्चा केली. त्यांनी निर्यातदारांना त्यांची शक्ती, क्षमता आणि विशिष्ट क्षेत्रांतील स्पर्धात्मक लाभ ओळखून जागतिक बाजारपेठेत त्यांचा वापर करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
निर्यातदारांच्या प्रयत्नांमध्ये सरकार एक सक्रिय समर्थक आणि सहाय्यक असेल, असे आश्वासन त्यांनी दिले. परदेशातील भारतीय दुतावास त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, प्रोत्साहने दिली जाऊ शकतात परंतु ते न्याय्य, वाजवी आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे पालन करणारे हवे, असे ते म्हणाले. निर्यातीच्या उद्देशाने नजीकच्या काळात पुढे नेता येतील अशा विशिष्ट क्षेत्रांची निवड करण्याचे काम मंत्रालय करत आहे.
या हंगामात भारतात रब्बी पिकांचे मोठे उत्पादन होत असून आपल्या साठवण सुविधा तुडुंब भरल्या आहेत. त्याच वेळीअनेक देशांमध्ये अन्नधान्याची टंचाई असल्याचे वृत्त आहे. कोविड -19 च्या संकटामुळे पुरवठा साखळ्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे बर्याच ठिकाणी योग्य दर्जा, चव आणि प्रमाणात अन्नधान्य मिळत नाही. कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या निर्यातीसाठी ही चांगली संधी असल्याचे दिसत आहे, असेही ते म्हणाले.