मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी भाजपवाले पळून गेले होते असा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपांना आता भाजपकडून उत्तर देण्यात येत आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावरून राजकारण तापताच गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप नेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. तर भाजप नेत्यांमध्येही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
अशात भाजप नेते आशिष शेलार म्हणाले,’चंद्रकांत पाटील यांचे हे वैयक्तिक मत आहे. त्यांना हे वक्तव्य टाळता आले असते. संपूर्ण रामजन्मभूमी अभियान, बाबरी ढांचा पाडणे ही कारसेवक हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. भाजपने याचे श्रेय घेतले नाही आणि भविष्यातही कधी घेणार नाही. सकल हिंदू समाज एकत्र राहावा, 500 वर्षांपासूनची मागणी होती, आमच्या साधू संतांनी हे आंदोलन सुरु केले होते. त्यात संपूर्ण समाज जोडण्यासाठी समाजातील सर्व जण एकत्रित आले होते. त्यात महत्त्वाची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी बजावली होती, त्याचा निश्चित फायदा झाला होता. बाळासाहेबांच्या या भूमिकेचा आम्ही सन्मान करतो.” असं म्हणत शेलार यांनी आपली भूमिका मांडली आहे,