मुंबई : राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या संपूर्ण राजकारणावर याचा परिणाम झाला आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाला हात देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीने भाजपची ताकद वाढली असली तरी दुसरीकडे सरकारमध्ये असणाऱ्या शिंदे गटामधून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर समोर येत आहे. याविषयीची खदखद शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिंदेंकडे बोलून दाखवली असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिंदे गटाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली. याच बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे गटातील काही मंत्र्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली.
शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांसह उदय सामंत , गुलाबराव पाटील , शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदिपान भुमरे उपस्थित होते. प्रत्येकाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक छोटीशी बैठक झाली ज्यात त्यांनी विभागांच्या संभाव्य वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवार आणि त्यांच्या निष्ठावंतांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्य सरकारमध्ये आल्यानं जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. रायगड, नाशिक, सातारा जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही नेत्यांचे आपापसांत मतभेद आहेत. हेच वाद पुन्हा वाढू शकतात, अशी भिती शिंदे गटातील नेत्यांना वाटत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.