न्हावरे – न्हावरे-आंबळे-निमोणे गावांच्या शिवेवर एका शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या गुरुवारी (दि.19) मध्यरात्री जेरबंद झाला. मात्र, याबाबत वन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला याची कानोकान खबर नसल्याने गुरूवारी मध्यरात्री जेरबंद झालेला बिबट्या तब्बल 14 ते 16 तासांनी जेरबंद झालेल्या ठिकाणावरून जुन्नर येथील माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात हलवण्यात आला.
न्हावरे-आंबळे-निमोणे या गावांच्या शिवेवर उसाचे क्षेत्र आहे. याठिकाणी गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने सोमवारी (दि.16) शेतकरी पांडुरंग दुर्गे यांच्या शेतात पिंजरा लावला होता.
मात्र, पिंजरा लावलेल्या ठिकाणाला बिबट्या वारंवार गुंगारा देत होता. अखेर गुरुवारी मध्यरात्री बिबट्या भक्ष्याच्या शोधात फिरत असताना दुर्गे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात तो जेरबंद झाला.
या घटनेबाबत परिसरातील वनपाल, वनरक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. माहिती घेऊन तुम्हाला सांगतो, असेही सांगितले. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाच याबाबत माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिरूर वनविभागाला शेतकऱ्यांच्या त्रासाचे घेणे-देणे नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. याबाबत शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला माहिती नसून मी कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी आलो आहे.