नवी दिल्ली – देशात सुमारे सात दशकांनंतर चित्ते पुन्हा दाखल होणार आहे. नामिबियातील आठ चित्ते लवकर देशात आणण्यात येणार आहेत. या सर्व चित्त्यांना एकाच दिवशी दोन विमानाने कुनो येथे नेले जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्यांना क्वारंटाइन सेंटरमधून उद्यानात सोडले जाईल.विशेष म्हणजे चित्त्यांना आणण्यासाठी भारताचे स्पेशल विमान नामिबियात पोहोचले आहे.
या विमानावर चित्त्याचे एक सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्त्यांना प्रथम कार्गो विमानाने नामिबियाहून जयपूरला आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी हेलिकॉप्टरमधून मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याच हस्ते हे चित्ते देशात वास्तव्यासाठी सोडले जातील.
नामिबियातील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले की, वाघांच्या भूमीवरून सदिच्छा राजदूताला घेऊन जाण्यासाठी बहादूरच्या भूमीत विशेष पक्षी दूत दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर (शनिवार) वाढदिवसानिमित्त करहल, श्योपूर येथे येणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते नामिबियन चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कच्या क्वारंटाईन एनक्लोजरमध्ये सोडले जाईल. यासोबत ते कराहल येथील आजीविका मिशनच्या बचत गटात सहभागी होणार असून स्वावलंबी भगिनींच्या परिषदेला संबोधित करणार आहेत.
भारतात येणाऱ्या या 8 चित्त्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये तीन नर आणि पाच मादींची नोंद झाली आहे. त्यांचे वय अडीच ते साडेपाच वर्षे आहे. त्यांच्यापैकी दोघे भाऊ असून ते नामिबियातील एका खासगी रिझर्व्हमध्ये राहत असल्याचीही माहिती मिळाली आहे.