आफ्रिकेतील नामिबियातून आणलेले आठ चित्ते लवकरच भारतीय भूमीवर धावताना दिसणार आहेत. 1952 मध्ये नामशेष झाल्याच्या घोषणेनंतर जवळपास 70 वर्षांनी भारतात चित्ता दिसणार आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये पोहोचल्यानंतर या चित्त्यांना सोडले आहे. या चित्त्यांना आणण्यासाठी भारताने नामिबियासोबत विशेष करारही केला आहे.
मात्र, दरम्यान, आफ्रिकन खंडातील मोठा मांसाहारी प्राणी म्हणून ओळखला जाणारा चित्ता भारताच्या पर्यावरणाशी कसा जुळवून घेणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय शास्त्रज्ञ या चित्तांबद्दल नेमके कशामुळे चिंतीत आहेत, चला जाणून घेऊया.
० भारतात चित्त्यांना कसे ठेवले जाणार आहे?
कुनो येथे पोहोचल्यानंतर या चित्त्यांना ३० दिवस क्वारंटाईन केले जाईल. या दरम्यान त्यांना बंदिस्त आवारात ठेवण्यात येईल. त्यांच्या आरोग्यावर व इतर कामांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जर सर्व काही ठीक झाले तर तीस दिवसांनंतर सर्व चित्ते जंगलात सोडले जातील.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की या चित्त्यांना ठेवण्यासाठी कुनो नॅशनल पार्ककडून खास तयारी करण्यात आली आहे. हे अभयारण्य सुमारे दशकभरापूर्वी गीरमधील आशियाई सिंहांना आणण्यासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, या सिंहांना गीरहून कुनो येथे आणता आले नाही. या ठिकाणी बदलीची सर्व तयारी करण्यात आली होती. सांबार, चितळ यांसारखे प्राणीही सिंहाच्या शिकारीसाठी कुनोमध्ये हलवले गेले.
अशा प्रकारे सिंहासाठी केलेली तयारी आता चित्त्यांच्या स्थलांतराच्या काळात कामी येणार आहे. कुनो व्यतिरिक्त, सरकारने मध्य प्रदेशातील नौरादेही वन्यजीव अभयारण्य, राजस्थानमधील भैसरोडगढ वन्यजीव संकुल आणि शाहगढ येथे वैज्ञानिक मूल्यांकन केले होते. मूल्यांकनानंतर, कुनोची चित्यांच्या हस्तांतरणासाठी निवड करण्यात आली. 2021-22 ते 2025-26 या कालावधीत या चित्त्यांसाठी 38.70 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये चित्ते भारतात आणण्याच्या बजेटचाही समावेश आहे.
० ही विशेष व्यवस्था असतानाही तज्ज्ञ चिंता का व्यक्त करत आहेत?
तज्ज्ञांनी चित्ता ठेवण्याच्या व्यवस्थेबाबत सर्वाधिक चिंता व्यक्त केली आहे. सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीजचे एमेरिटस डायरेक्टर उल्हास कारंथ म्हणतात की ते या प्रकल्पाच्या विरोधात नाहीत तर भारताच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रीय उद्यानात चित्ता आणण्याच्या विरोधात आहेत. नॅशनल जिओग्राफिकशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, चित्त्यांना अशा ठिकाणी ठेवले जात आहे जेथे प्रत्येक चौरस किलोमीटरवर 360 लोक राहतात. म्हणजेच चित्यांच्या स्वातंत्र्याला मोठा धोका आहे.
वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणारे स्वतंत्र शास्त्रज्ञ अर्जुन गोपालस्वामी यांच्या मते, मुक्त वातावरणात राहणाऱ्या चित्त्यांना आता उघड्यावर राहणे सोपे जाणार नाही. आफ्रिका आणि भारताची तुलना करताना ते म्हणाले की, भारतातील चित्ता नामशेष होण्यामागे काही कारणे आहेत. एक प्रमुख कारण म्हणजे माणसांची वाढती संख्या आणि त्यामुळे मुक्त वनक्षेत्रावरील वाढता दबाव. गेल्या 70 वर्षात ही स्थिती सुधारली नाही, उलट अधिकच बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत या प्राण्यांना आणण्याचा प्रयत्न का करण्यात आला हा पहिला प्रश्न आहे.
० चित्ता भारतात आणण्याबाबत तज्ज्ञांचं मत काय ?
चित्ते भारतात आणण्याबाबत तज्ज्ञांनी फक्त चिंता व्यक्त केली असे नाही, तर काही वन्यजीव तज्ज्ञांनीही चित्ता भारतात ठेवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डीन जदवेंद्र झाला यांनी नॅशनल जिओग्राफिकला सांगितले की, चित्ता हे जाहीररीत्या शानदार प्राणी आहेत. भारतातील इको-टूरिझमला चालना देण्याचे हे एक महत्त्वाचे माध्यम बनेल. जर चित्ते भारतात आले असतील, तर सरकार त्यांच्या संवर्धनासाठी आणि पालनपोषणासाठी निधी खर्च करेल. जेणेकरून भारतातील जैवविविधता टिकवून ठेवता येईल.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही चित्ता भारतात आणण्याच्या मुद्द्यावर एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी या निर्णयामागची कारणमीमांसा दिली असून भारतातून ज्यामुळे हे प्राणी नामशेष झाले होते, त्या चुका सुधारण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारताने अशा अनेक प्रजातींचे जतन केले आहे, ज्यांची संख्या गंभीर स्थितीत होती. यामध्ये वाघ, सिंह, आशियाई हत्ती, मगर आणि एक शिंगे असलेले गेंडे यांचा समावेश होता. ते म्हणाले की, चित्ता भारतात आणणे हे देशातील ऐतिहासिक उत्क्रांती संतुलन राखण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.