मुख्याधिकाऱ्यांनी शहराचे नियोजन करण्याची अपेक्षा
सातारा – शिवजयंतीनंतर साताऱ्यात रडतखडत सुरू झालेली पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम पूर्णपणे थंडावली आहे, कधी पोलीस बंदोबस्त नाही तर कधी मुख्याधिकाऱ्यांची परवानगी नाही, अशी कारणे शहर विकास विभागातून दिली जात आहे. येथील तापमानाचा पारा 30 अंशांपर्यंत वर चढला असून उन्हाच्या वाढत्या तडाख्याने मोहिम गुंडाळण्यात आल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दोन-तीन दिवस अतिक्रमणे हटविण्याचा “रोड शो’ पालिकेने केला. या मोहिमेने रस्ते काही मोकळे झाले नाहीत. पोलीस बंदोबस्ताची पाठ फिरल्याने ही मोहीम बासनात गेल्याचा संदेश गेल्याने अतिक्रमणांचे बस्तान पुन्हा बसले असून शहर विकास विभाग बंदोबस्तांच्या तारखांसाठी घोडे नाचवत आहे. प्रत्यक्ष कारवाईसाठी यंत्रणा सज्ज असली तरी साहेबाची परवानगी नाही, असे सरकारी छापाचे उत्तर आहे.
पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पोलीस बंदोबस्तात पोवई नाका मंडईतील रस्त्यावर पडलेल्या खोक्यांची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली होती, तेव्हा हॉकर्सवाल्यांनी रॉकेल अंगावर ओतण्याचा स्टंट केला. त्यामुळे बायोमेट्रिक सर्वेचा विषय मार्गी लागला. दोन दिवस पालिकेची ही मोहीम त्याच भागात घुटमळत होती. नंतर कालिदास पंप ते पोलीस कवायत मैदान व एसटी स्टॅन्ड ते पारंगे चौक येथील रस्त्यावरील खोकी पालिका कर्मचाऱ्यांनी हटविली.
याच काळात रस्त्यावरील विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले. एवढेच काय ते चार दिवसांच्या मोहिमेचे संचित मानावे लागेल. त्यानंतर जो अतिक्रमण विभागातून अतिक्रमण प्रमुख मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील मोहिमेतून बेपत्ता झाले ते अद्यापपर्यंत. दोन आठवड्यात चार दिवसाचा अतिक्रमण हटावचा स्टंट केल्यावर मुख्याधिकारी शंकर गोरे हाताची घडी घालून शांत आहेत.
सातारा पालिकेतल्या प्रशासनाचीच इच्छा नसल्याने ही मोहीम थंडावल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. नगरसेवकांचा हस्तक्षेप व पालिकेची ढिलाई यामुळे सातारकरांच्या नजरा आता जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे लागल्या आहेत. या संदर्भातील आवश्यक तयारी करणार असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पालिकेच्या दारातच अतिक्रमण
पोवई नाका परिसर, मंगळवार तळे परिसर, गोडोली, राजपथ व कर्मवीर पथ, गणतपराव तपासे पथ, समर्थ मंदिर परिसर, बस स्थानक परिसर, रविवार पेठ जुनी मंडई आदी प्रमुख ठिकाणी अतिक्रमणे तशीच आहेत. एका व्यावसायिकाने पालिका मुख्यालयाच्या दारातच खोके टाकून पालिकेला आव्हान दिले आहे. खोक्यांची एवढी अतिक्रमणे बोकाळली असताना पालिका अधिकारी-पदाधिकारी शांत कसे बसू शकतात, असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.