ठाणे – “हे सरकार काही महिन्यांचे, काही दिवसांचे नाही तर काही तासांचेच आहे. आम्ही सत्तेत आल्यावर सगळ्याचे मोजमाप करु, अशी घणाघाती टिका शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या(मविआ) वतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता, त्याप्रसंगी आदित्य बोलत होते.
या भाषण दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली. आदित्य यांनी आपल्या भाषणावेळी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. यावेळी कार्यकर्त्यांनी वन्स मोर अशी घोषणाबाजी केली.
आदित्य ठाकरे म्हणाले,’महिलांवर हात उचलायचे, सुषमा ताई, सुप्रिया ताईंना शिवीगाळ करायची आणि मर्दानगी दाखवायची असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. यावेळी त्यांनी शर्ट झटकलं, इकडेतिकडे बघितलं आणि नंतर दाढीला हात लावला. त्यांच्या या नक्कलीवर अनेक कार्यकर्ते हसले. त्यानंतर त्यांनी पुन्हा निशाणा साधायला सुरुवात केली.
दरम्यान, मोर्चाला संबोधित करताना आदित्य पुढे म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर गद्दार गॅंगचे जे आयपीएस, आयएएस आणि इतर अधिकारी आहेत, त्यांच्याविरोधात बदल्याच्या भावनेतून नाही तर लोकांसाठी आम्ही चौकशी करु आणि त्यांना तुरूंगात टाकू. आजच्या मोर्चाला तब्बल 17 अटी घालण्यात आल्या. टाका, आमच्या सगळ्यांवर केसेस टाका. पुन्हा एकदा होऊनच जाऊदे.
पोलीस आयुक्तांच्या ऑफिससाठी आम्ही एक टाळे आणलेले आहे. कारण जेव्हा मिंधेंच्या गद्दार गॅंगच्या टोळींनी जेव्हा शिंदे ताईंवर हल्ला केला. तेव्हा तक्रार घ्यायला ते तयार नव्हते. उद्धवसाहेब चिडून पोलीस आयुक्तालयात गेले तर, पोलीस आयुक्त पळून गेले होते.
मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. तुम्ही ज्याला स्वत:चा बालेकिल्ला मानता(आता मानत नाही) त्या ठाणे शहरात आलो आहे. तुम्हाला आव्हान आहे की, मी ठाण्यातून लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत, असे म्हणत आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान दिले.