मुंबई – तुम्ही ज्याला स्वत:चा बालेकिल्ला मानता त्या ठाणे शहरात आज मी आलो आहे. मी ठाण्यातून लढून जिंकून दाखवणार असं आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. शिंदे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता, त्याप्रसंगी आदित्य बोलत होते.आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिल आहे.
लोकशाहीत कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला पाडायचे असं स्पष्ट मत मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केले.तसेच बोलणाऱ्यांची जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शाखा प्रमुख म्हणून आनंद दिघेंच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो असा टोला देखील यावेळी शिंदेंनी लगावला.
ठाण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. यादरम्यान एका ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला अनेकांनी चोप दिल्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता. यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात सभा घेतली. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे नेमकं
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. तुम्ही ज्याला स्वत:चा बालेकिल्ला मानता(आता मानत नाही) त्या ठाणे शहरात आलो आहे. तुम्हाला आव्हान आहे की, मी ठाण्यातून लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत, असे म्हणत आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान दिले होते.
“एका व्यक्तीच्या स्वार्थापायी सरकार उलथवले. आम्ही लवकरच पुन्हा सत्तेत येणार, ज्यांना जागा दाखवायची त्यांना जागा दाखवणार, असा हल्लाबोलही आदित्य यांनी यावेळी केला. यावेळी सुषमा अंधारे तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.