तळेगाव दाभाडे – महाविकास आघाडीच्या काळात समृद्ध असलेला महाराष्ट्र हा खोके सरकारचे काळात पुरता कोलमडलेला असून कृषी आणि उद्योग क्षेत्राची पीछेहाट होत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.
तळेगाव शहर शिवसेना व मावळ तालुका शिवसेना (ठाकरे गट) यांचे संयुक्त विद्यमाने येथील मारूती मंदिर चौकात जाहीर स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. सभेस शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघिरे, एकनाथ पवार, अनिकेत घुले, अशोक खांडेभराड, तळेगाव शाखाप्रमुख शंकर भेगडे, योगेश बाबर, शैलेश मोहिते, अमोल पवार, भारत ठाकूर, शांताराम भोते, रूपाली अहिर, संगीता सोनवणे, शैलजा खंडागळे, प्रभाकर पवार, राजेंद्र पचपिंड आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्याचे गद्दार सरकार हे जनतेचे प्रश्न समजून घेण्याऐवजी जनतेला फसवी आश्वासन देत आहे. त्यामुळे सर्वत्र संताप दिसत आहे. तर बेरोजगार, बेकारी आणि महागाईच्या ओझ्याखाली अडकल्याची आहे. सध्याच्या खोके सरकारच्या काळात नवा कोणताही उद्योग महाराष्ट्रात सुरू झालेला नाही. आहे तेच उद्योग महाराष्ट्र बाहेर जात आहेत.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
स्वागत माजी महापौर संजोग वाघिरे यांनी केले. प्रास्ताविक आमदार सचिन अहिर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कुंभार, मदन शेडगे यांनी केले. आभार तळेगाव शहर शाखाप्रमुख शंकर भेगडे यांनी मानले.
सर्व उद्योग शेजारच्या राज्यात
या सरकारची आजची आश्वासने फसवी असून राज्यातील उद्योग, रोजगार नोकऱ्या राज्यात राहिल्या नाहीत. सर्व गोष्टी शेजारच्या राज्यामध्ये जात आहेत. यामध्ये सध्याचे सरकार हतबल झाले आहे. तसेच नुकताच झालेला विश्वचषक सामना गुजरातला गेल्यामुळेच भारत हरला, अशी उपरोधिक टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली.