मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान करत त्यांच्यावर जोडरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन भाजप सोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले आहेत. शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने अनेक शिवसैनिक त्यांच्यावर नाराज झाले असल्याचं पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, आता अश्यातच आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान केल्याचं दिसून आलं आहे. आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर असून नाशिकरोड येथील आनंद ऋषी शाळेजवळील मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी वरळी मधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. पण आता आपण दोघे राजीनामा देऊ तुम्ही वरळी जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात येऊन लढतो’ असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
‘मी वरळीमधून राजीनामा देतो… तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा’ – आदित्य ठाकरे
“महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी गद्दारी केली. पण त्या सर्वांना मी आजही चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर पुन्हा निवडून येता का ते पाहा. मी तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलं आहे. मी वरळीमधून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. मग पाहू तुम्ही कसे निवडून येता? असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंना केलं होत.