पाच वर्षांत सरसकट कर्जमाफी का केली नाही?
मुंबई: “जनतेच्या प्रश्नावर आजपर्यंत शिवसेना संघर्ष करत आली आहे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही”, अशी वक्तव्ये शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या भाषणातून हल्ली सतत ऐकू येत आहेत. पण शिवसेना सत्तेत असूनही इतकी वर्ष सरसकट कर्जमाफी का झाली नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.
पाच वर्षात कर्जमाफी का नाही करता आली? विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आदित्य ठाकरेंना शेतकऱ्यांचा पुळका आला आहे का? हे खरे प्रश्न आहेत.
सत्तेच्या मोहापाई भाजप-शिवसेनेने शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि दुष्काळाचा बाजार मांडला, जनतेची दिशाभूल व्हावी म्हणून दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यरोप केले. यातच पाच वर्ष उलटून गेली आणि दुष्काळाच्या दुष्टचक्रात बळीराजा अडकला. अशात पुढचा मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेनेने चर्चेत आणले आहे. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असे शिवसेनेला सूचवायचे आहे का?, असे देखील राष्ट्रवादीने म्हटले आहे.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय गप्प बसणार नाही- आदित्य ठाकरे