नीरा (वार्ताहर)-गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीलाच नीरेच्या खोऱ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. मात्र, यंदा जून महिना अर्धा संपत आला तरी नीरा खोऱ्यात सुमारे 12 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नीरेच्या खोऱ्यात तब्बल 11.21 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा नीरेच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी पावसाने सुरुवातीला ओढ दिली होती. मात्र, यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले आहे. धरणात पाणीसाठा पुरेसा आहे. सध्या वीर धरणातून नीरा डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे.
मागील पाऊस उशिरा आला. परतीचा पाऊस जादा बरसला. सुरुवातीला कमी पडलेल्या पावसाने नंतर सरासरी ओलांडली होती. उशिरा आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामात पाण्याचा वापर कमी झाला होता. त्यामुळे पाण्याची मागणी रब्बीच्या हंगामात घटली होती. पावसाळा सुरू झाला तरी नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर धरणात पाणी शिल्लक आहे. सध्या वीर धरणाच्या डाव्या कालव्यातून 675 क्युसेक तर उजव्या कालव्यातून 852 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. नीरेच्या खोऱ्यात एकूण 11.214 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. तो एकूण साठ्याच्या 23.20 टक्के एवढा आहे. मागीलवर्षी याच तारखेला नीरा खोऱ्यात केवळ 1.839 टीएमसी (3.18 टक्के) पाणीसाठा होता.
नीरा देवघरमध्ये 16 टक्के साठा
नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणात 1.94 टीएमसी म्हणजे एकूण क्षमतेच्या 16 टक्के पाणीसाठा आहे. भाटघर धरणात 6.250 टीएमसी (27.59 टक्के), वीर धरणात 2.110 टीएमसी (22.42 टक्के) गुंजवणी धरणात 0.970 टीएमसी (24.57 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.