कवठे -आसले (ता. वाई) येथील श्री भवानी देवीच्या मंदिरामागील वैराटगडाच्या डोंगरपायथ्याला तब्बल 3000 फळरोपांची लागवड आता चांगलीच बहरली आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या या वृक्षलागवडीतून वैराटगडाचा पायथा विविध फळांच्या वृक्षांनी बहरला असून भवानी देवीच्या मंदिर परिसरात जणू हिरवाईचा जागर सुरु असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे, असे गौरवोद्गार किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी काढले. नुकतीच भेट देऊन त्यांनी या परिसराची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते.
वैराटगडाच्या पायथ्याला गोंधळवाडी (आसले) येथे श्री भवानी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागे आसले ग्रामपंचायतीच्या मालकीची सुमारे 28 एकर जागा असून ती सर्व जागा मुरमाड आणि खडकाळ आहे. दोन वर्षापूर्वी या परिसरात फळरोप लागवडीचा निश्चय करण्यात आला. त्यास सर्व ग्रामपंचायतीचा होकार मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. लावायची ती फळरोपेच असा निर्धार करून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात जावून रोपे आणली.
त्यामध्ये तीन प्रकारचे आंबे, करवंद, बहाडोली जांभूळ, पुरंदर सिताफळ, ड्रॅंगन फूट, कापा फणस, नरेंद आवळा, चिंच, हादगा, लाल पेरू, दोन प्रकारचे नारळ अशा विविध फळांच्या रोपांचा समावेश होता. रोपे आणल्यानंतर लगोलग मंदिरामागे पाच एकर जागेत 2300 खड्डे नियोजनबद्ध पद्धतीने खाणण्यात आले. फळरोपांची लागवड केल्यानंतर ती रोपे जगविण्यासाठी मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीतून पाईपद्वारे पाणी देण्यात येत होते. मात्र ते अपुरे पडत असल्याने दोन मोठ्या टाक्या देणगी म्हणून मिळवल्या. ठिबक सिंचन करून पुरेसे पाणी उपलब्ध केले. दोन वर्षानंतर या सर्व मेहनतीला चांगले फळ आले आहे.
शेततळ्याची निर्मिती करणार
आसले ग्रामस्थांचा हा प्रयोग महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना, संस्थांना प्रेरणा देणारा आहे. या ठिकाणी शेततळ्याची निर्मिती करणार असून त्यातून या फळबागेला पाणी उपलब्ध होण्यासोबत आणखी काही क्षेत्रावर निश्चितपणे फळबाग निर्माण होईल, असा विश्वास मदन भोसले यांनी व्यक्त केला.